मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

कामाच्या विलंबाबद्दल नितीन गडकरी संतापले

| गोवा | प्रतिनिधी |

गेल्या 18 वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या पूर्वीच्या मुंबई-गोवा महामार्गाला जणू ग्रहण लागल्याची स्थिती आहे. गेली अनेक वर्षे लोकार्पणच्या प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला होत असलेल्या प्रदीर्घ विलंबाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कामाला विलंब होत असल्याने आपल्याला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले. याच कारणामुळे महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पणजी येथील पोरवोरिममध्ये त्यांनी सहापदरी उन्नत मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी गडकरी बोलत होते.

मुंबई-गोवा महामार्गाची ते आता ऑक्टोबरमध्ये स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मुंबई विमानतळापासून गोव्यापर्यंत प्रवास करून महामार्गाचे काम आणि प्रवासात काय सुविधा आहेत हेदेखील ते पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकदेखील झाली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, पायाभूत सुविधा प्रकल्यापांच्या कामामध्ये विलंब किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मुंबई-गोवा महामार्गाची लांबी 440 किलोमीटर असून, सदर महामार्गाच्या रूंदीकरणाला मुदतवाढ मिळाली आहे. जेथे काम पूर्ण झाले आहे, त्याठिकाणी पहिल्याच पावसात खड्डे आणि रस्त्यांचे नुकसानदेखील झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वळणमार्ग, तसेच पाणी साचणे, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरुस्ती यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांचे निलंबन
पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये विलंब किंवा निकृष्ट काम करणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल. त्याचबरोबर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. एका वर्षात जास्तीत जास्त ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणे, त्यांच्यावर कारवाई करणे आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा रेकॉर्ड करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्गावर स्थानिक संस्कृतीचे दर्शन
गडकरींनी गोवा सरकारला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांसाठी विशेष सुविधा विकसित करण्याची सूचनाही केली. या सुविधांमध्ये गोव्याची वास्तुकला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला परंपरा यांचे दर्शन घडवता येईल, असे त्यांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेल पंपांबरोबरच जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर पर्यायी इंधनांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
2011 मध्ये कामाला सुरुवात
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रकल्प 2011 मध्ये सुरू झाला होता आणि तो 2016 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मुंबई आणि गोवा यांच्यातील प्रवासाचा वेळ साधारण 12 तासांवरून 6 तासांपर्यंत कमी करणे हा यामागचा उद्देश होता. मात्र, मुदत संपल्यानंतरही अनेक टप्प्यांवरील काम अपूर्णच राहिले. सुमारे 16,000 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प होता.
Exit mobile version