वेगवान खेळासाठी आयसीसीचे ‌‘स्टॉप क्लॉक’

वेस्ट इंडिज-इंग्लंडविरुद्ध मालिकेपासून नियम लागू

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकदिवसीय व टी-20 या दोन प्रकारांमध्ये वेळ वाया जाऊ नये, वेगवान खेळ व्हावा, यासाठी आयसीसीकडून ‌‘स्टॉप क्लॉक’ चाचणीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार दोन षटकांमध्ये फक्त 60 सेकंदांचाच अवधी देण्यात आला आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यामधील पहिल्या टी-20 लढतीने नव्या नियमाला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.20 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

षटकांमधील वेळ मर्यादित करण्यासाठी ‘स्टॉप क्लॉक’ चाचणी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेपासून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या नियमाची माहिती दिली. एक षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंद पूर्ण होण्याआधी दुसरे षटक टाकायला तयार राहायला हवे, असा नियम तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे.

एकदिवसीय व टी-20 या दोन्ही प्रकारांत खेळाडूंकडून षटकांची गती राखली जात नाही. तसेच, काही वेळा मैदानात विनाकारण वेळ वाया घालवला जातो. याची आयसीसीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. अशा घटनांना आळा बसवण्यासाठी आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. गोलंदाजांकडून 60 सेकंदांचा अवधी तीन वेळा ओलांडल्यास त्यांना पाच धावांना मुकावे लागणार आहे. अर्थातच त्यांना पाच धावांची पेनल्टी लागणार आहे.

स्टॉप क्लॉक नियम काय आहे?
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की ‌‘स्टॉप क्लॉक' षटकांमधील वेळ मर्यादित करेल. याचा अर्थ, गोलंदाजी संघाने मागील षटक पूर्ण केल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील षटकाचा पहिला चेंडू टाकण्यास तयार असणे आवश्यक आहे. डावात तिसऱ्यांदा (दोन इशाऱ्यांनंतर) असे करण्यात अयशस्वी झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल.

आमचे लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळाचा वेग वाढवण्याचे मार्ग शोधण्यावर आहे. जर संघ शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धारित वेळेत टाकण्याच्या स्थितीत नसेल, तर आतील वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक उभे करण्याची परवानगी द्यावी. चाचणी संपल्यानंतर स्टॉप क्लॉक चाचणीच्या निकालांचे मूल्यमापन केले जाईल.

वसीम खान,
महाव्यवस्थापक, आयसीसी
Exit mobile version