तहसीलदारांचे दुर्लक्ष, महसूल यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेकायदेशीर रेती व खडी उत्खननावर शासनाने बंदी घातलेली असतानाही अलिबाग तालुक्यातील सागाव नदीपात्रात खुलेआम अनधिकृत उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाकडे स्थानिक महसूल प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, तलाठी व मंडळ अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. अलिबागच्या तहसीलदारांकडूनही या उत्खननाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात असून, तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील सागाव नदीलगत मोठ्या प्रमाणात शेतजमिनी असून, या नदीचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भाजीपाला तसेच इतर पिकांच्या लागवडीसाठी या नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मात्र, सध्या नदी कोरडी पडल्याचा फायदा घेत सागर वेळे नावाच्या व्यक्तीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता नदीपात्रातून खुलेआम खडी व मातीचे उत्खनन केल्याचे समोर आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात खोदकाम करून मोठ्या प्रमाणावर खडी-माती काढली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सागाव नदीत हे उत्खनन सुरू असतानाही संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्तीविरोधात स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या उत्खननामुळे नदीलगत असलेली पाच एकरांहून अधिक शेतजमीन धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पाण्याचा प्रवाह बदलून उधाणाचे पाणी थेट शेतजमिनीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊन शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.
या भागात भातशेतीसह कांदा, वाल यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, नदीपात्रातील अनधिकृत उत्खननामुळे या पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाविरोधात स्थानिक शेतकरी ज्ञानेश्वर खराडे यांनी आवाज उठविला आहे. कार्ले गावाजवळ नदीलगत त्यांची शेतजमीन असून, उत्खननामुळे त्यांच्या शेतीवरही संकट ओढवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात नदीतून वाहून आलेल्या गाळामध्ये रेती, खडी व माती साचलेली असते. याच गाळाचा उपसा खंडाळे-ढोलपाडा येथील सागर वेळे यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमएच 40 सीए 235 या क्रमांकाच्या जेसीबीद्वारे नदीपात्रात खोदकाम करून एमएच 06 एजी 8073 या क्रमांकाच्या डंपरमध्ये रेती-खडी भरून त्याची वाहतूक करण्यात आल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे. ही रेती-खडी एका धनदांडग्या व्यक्तीच्या जागेत भरावासाठी बेकायदेशीररित्या नेली जात असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.
शासनाचा महसूल बुडवत हा अवैध व्यवसाय दिवस-रात्र सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. काहींच्या राजकीय वरदहस्तामुळेच संबंधित व्यक्ती हे अनधिकृत उत्खनन करत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. नदीपात्रातील खोदकामामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या उत्खननाचा परिणाम आसपासच्या शेतीवर होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे ज्ञानेश्वर खराडे यांनी नमूद केले आहे. या सर्व बाबींची माहिती त्यांनी अलिबाग तहसीलदारांना दिली असून याबाबत लेखी तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या भूमिकेबाबत स्थानिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
महसूलमंत्र्यांकडेही तक्रार
सागाव नदीतून राजरोसपणे रेती-खडीचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याचा आरोप करत स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही कारवाई न झाल्याने अखेर शेतकरी ज्ञानेश्वर खराडे यांनी थेट महसूलमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात महसूलमंत्री काय भूमिका घेणार आणि संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.






