पाली-भूतवली धरणाला धोका; शेतकऱ्यांचा आरोप, शासनाच्या रॉयल्टीवर गदा
| नेरळ | संतोष पेरणे |
कर्जत तालुक्यात सध्या माती तस्करीचा गंभीर प्रकार समोर आला असून, बेकायदेशीर खोदकामामुळे पाली-भूतवली धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून, महसूल विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मध्य रेल्वेकडून कर्जत परिसरात नवीन कारशेड उभारण्यात येत आहे. ही कारशेड सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरात पसरलेली असून, मातीचा भराव टाकून जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. सुरुवातीला भिसेगाव येथून माती आणली जात होती. मात्र, या ठिकाणी माती उत्खननासाठी शासनाचे स्वामित्व शुल्क रॉयल्टी पूर्णपणे भरली जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर नवीन ठिकाणांवरुन माती काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडे रेल्वेकडून कारशेड उभारले जात आहे. मध्य रेल्वे 2021 मध्ये वसई विरार भागात कारशेड उभे राहिल्यानंतर कर्जत मार्गावर नवीन कारशेड उभारण्यास मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेवरील सर्वात मोठे कारशेड बनणार असून, साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरात हे नवीन कारशेड असणार आहे. या कारशेड चे कामाला सुरुवात झाली असून, मातीचा भराव टाकून जमीन सपाट करण्याचे काम केले जात आहे. मात्र, त्या कामासाठी बाहेरून आणली जाणारी माती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सध्या भिसेगाव भागातून माती आणली जात असून, दररोज शेकडो ब्रास माती तेथे टाकण्यात येत आहे. मात्र, बाहेरून उचलल्या जाणाऱ्या मातीसाठी शासनाच्या महसूल विभागाला स्वामित्व शुल्क म्हणजे रॉयल्टी भरावी लागते. परंतु, भिसेगाव येथील मातीच्या खोदकामाला जेमतेम रॉयल्टी महसूल विभाग भरली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून रेल्वेच्या कामासाठी मातीचा भराव टाकला जात आहे. कारशेडसाठी दररोज माती घेऊन येणाऱ्या ट्रकसाठी खास रस्ता बनविण्यात आला आहे, त्याच रस्त्यासाठी काहीशे ब्रास माती लागली आहे.
भिसेगाव येथून काढली जाणारी माती हि अल्प रॉयल्टी भरून कारशेडचे ठिकाणी आणली जात होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्ररी केल्या आहेत. त्यानंतर आता डिकसळ येथील डोंगर फोडून माती काढली जात असून, लोणावळा येथील ट्रक ती माती डिकसळ डोंगर येथून सावरगाव अशी वाहतूक करीत आहेत. या वाहतुकीस माती खोदकाम ज्या ठिकाणी केली जात आहे, त्या डोंगराच्या मागील बाजूस पाली-भूतीवली धरण शासनाने दीडशे कोटी रुपये खर्चून बांधले आहे. त्यामुळे धरणाच्या डोंगरात खोदकाम करून धरणाच्या जलाशयाला धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी माती ज्या ठिकाणावरून काढून वाहतूक केली जात आहे, त्या मातीबाबतदेखील स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी शासनाला रॉयल्टी भरली आहे काय? हेदेखील गुलदस्त्यात असून, शासनाचा कर बुडवून माती उत्खनन केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. महसूल विभाग याबाबत काही हालचाली करणार आहे काय? असा सवाल स्थानिक चिंचवली गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मध्य रेल्वे कारशेडसाठी उचलण्यात आलेल्या मातीसाठी स्वामित्व शुल्क भरुन घेतले जात आहे. स्वामित्व शुल्क भरलेले नसेल, तर त्या ठेकेदाराचे बिल रेल्वेकडून दिले जात नाही. आणि, त्यामुळे आमचे महसूलचे कर्मचारी त्या माती उत्खनन आणि भरावाबाबत सतर्क आहेत.
-डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार, कर्जत
