विधवा प्रथा मुक्तीचा हेरवाड पॅटर्न राबवा – उद्धव ठाकरे

जि.प.सीईओंना निर्देश
। मुंबई । प्रतिनिधी ।
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ठराव घेण्याबाबत प्रोत्साहीत करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. राज्य सरकारने बुधवारी 18 मे रोजी एक पत्रक काढून या संदर्भातील एक परिपत्रक काढले. यात हेरवाड ग्रामपंचायतीने केलेली ही कृती स्तुत्य असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असताना विधवा प्रथेचे समाजात पालन केले जाते. अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज होती. या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने ही प्रथा बंद घेण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा विचार केलाय. यासाठी ग्रामीण भागातील सर्व संबंधितांना निर्देश देण्याचे सरकारने ठरवले आहे.

विधवा महिलांना प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. सदर महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे आवश्यक आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

जिल्हा परिषदांना आदेश
विधवा प्रथेचे निर्मुलनासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी यासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आप आपल्या स्तरावरील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे तसेच ग्रामपंचायत हेरवाड जि. कोल्हापूर यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावा प्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहीत करावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

Exit mobile version