। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।
अष्ठविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात शनिवारी (दि. 17) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. ग. बा. वडेर हायस्कूल जवळील शतायु मेडिकल समोरून खडी घेऊन जाणाऱ्या एका डंपरच्या मागील फाळक्याची कडी अचानक तुटून मागील दुचाकीस्वाराच्या तोंडाला लागली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तोंडाला व जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सचिन केंद्रे असे जखमी दुचाकीस्वारांचे नाव असून ते जांभूळपाडा येथे ग्रामविकास अधिकारी आहेत. शतायु मेडिकलच्या समोरून बल्लाळेश्वर मंदिर बाजूकडे एक डंपर जात होता आणि त्याच्या बाजूने ग. बा. वडेर हायस्कूलच्या बाजूकडे एक डंपर पुढे येत होता यावेळी या ठिकाणी ट्रॅफिक झाली होती. त्याचवेळी ग. बा. वडेर हायस्कूलच्या बाजूकडे जाणाऱ्या डंपरची कडी तुटून केंद्रे यांना लागली व हा अपघात झाला. त्यांच्यावर नवी मुंबई येथे रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पालीतील प्रलंबित बाह्यवळण मार्गाचा (बायपास) मुद्दा आणि प्रशासकीय अनास्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाह्यवळण मार्ग लालफितीत असल्यामुळे भाविक, पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच अशा प्रकारचे अपघात देखील घडताना दिसत आहेत.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त येत असतात. पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठीकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर काही वेळेस वाहतुक पोलीस तैनात असून देखील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, डबर व खडी वाहतूक करणारे डंपर, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकिचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतुक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. संध्याकाळ नंतर मात्र बऱ्याच वेळा वाहतुक पोलीस तैनात नसतात. तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते नसतात. आणि यावेळी सुद्धा बऱ्याचवेळा वाहतुक कोंडी होते. आणि कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो.
पालीला वाली उरलेला नाही आणि प्रशासनाला जनतेचे काही पडलेले नाही. सामान्य माणूस येथे किड्या-मुंग्यांसारखे जीवन जगत आहे. पत्रकार प्रामाणिकपणे बातम्या देतात, पण राजकीय नेते फक्त बातमी वाचून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही करत नाहीत. जोपर्यंत बाह्यवळण मार्ग होत नाही आणि अवजड वाहतुकीवर कडक निर्बंध येत नाहीत, तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यातच राहील.
-प्रा. संतोष भोईर,
पाली
शहरात झालेला हा अपघात हे निव्वळ प्रशासनाचे पाप आहे. अनेकदा सूचना देऊनही ओव्हरलोड डंपरवर कारवाई केली जात नाही. सुधागडचे प्रशासन कोणाचा तरी जीव जायची वाट पाहत आहे का? बाह्यवळण मार्ग कागदावर ठेवून सामान्यांचा बळी घेण्याचे सत्र आता थांबले पाहिजे. यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाला जागे करणे गरजेचे आहे.
-अॅड. नरेश शिंदे,
पाली







