701 किमी लांबीचा मार्गा लोकसेवेत दाखल
। नागपूर । प्रतिनिधी ।
मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (दि. 5) पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला. लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण 701 किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर-मुंबई प्रवास 16 तासांऐवजी 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. शेवटचा टप्पा 76 किमीचा आहे. त्यात एकूण 5 जुळे बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी 11 किमी इतकी आहे. त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा देखील आहे. बोगद्यातील तापमान 60 अंशांपर्यंत गेल्यानंतर आपोआप पाण्याची फवारणी सुरू होईल. तापमान 30 पेक्षा कमी झाल्यावर पाण्याची फवारणी आपोआप बंद होईल. 100 टक्के अग्निविरोधी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. अपघातावेळी बचाव कारण्यासाठी जोडबोगदे तयार करण्यात आले आहेत.
61 हजार कोटीचा खर्च
समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 500 कोटींची खर्च अपेक्षित होता. पण, हा खर्च 61 हजार कोटींवर पोहोचला आहे. या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून, 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जाणाऱ्या सहापदरी शीघ्रगती महामार्गाचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्यात आले आहे.