सर्वाधिक मतदार दापोलीत, अलिबागच्या राजधानीत एकही मतदार नाही
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकशाहीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदान करणार आहेत. जिल्ह्यात 213 एनआरआय मतदारांचा समावेश असून, रायगड लोकसभा मतदारसंघात 54 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनादेखील रायगडचा खासदार निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे सर्वाधिक 38 एनआरआय मतदार हे दापोली मतदारसंघातील आहेत. जिल्ह्याची राजधानी असणार्या अलिबागमध्ये मात्र एकही अशा प्रकारच्या मतदाराचा मतदान यादीत समावेश नाही.
एनआरआय मतदारांनादेखील ओळखीचा पुरवा लागणार आहे. त्यांना मतदान करताना त्यांच्याकडे असणारे पासपोर्ट हे संबंधित मतदान केंद्रावरील मतदान केंद्र अधिकार्यांना दाखवणे बंधणकारक आहे. सामान्य मतदारांना मतदान ओळखपत्राखेरीज आवश्यक असणारे अन्य 14 पुरावे लागतात. त्यांची गरज एनआरआय मतदारांना लागणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले. आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघातील 16 लाख 53 हजार 935 मतदार सज्ज झाले आहेत. त्यामध्ये आठ लाख 13 हजार 515 पुरुष, तर आठ लाख 40 हजार 416 स्त्री आणि चार तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात खरी लढत ही इंडिया आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे. विविध ठिकाणी प्रचारसभा, रॅली, कॉर्नर बैठका, गावबैठकांना सुरुवात झाली आहे. अनंत गीते हे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत. सहा वेळा खासदार, मंत्री राहिलेले गीते यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तर, दुसरीकडे तटकरे यांच्यावर जलसंपदा विभागातील 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, तसेच मुलगा अनिकेत तटकरे यांच्या नावाने बेनामी कंपन्या असल्याचे आरोपही झाले आहेत. अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिंदे गटाच्या सत्तेमध्ये ते सामील झाले आहेत. आता त्यांना मोदी हे महान नेते असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सभांमधून त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. यावर त्यांच्याकडे कोणतेच ठोस उत्तर नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
7 मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदारराजादेखील तयारीत असून, मतदानाच्या दिवसाची वाट पाहात आहे. जिल्ह्यातील मतदारांच्या बरोबरीने आता एनआरआय मतदारदेखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात 213 मतदार आहेत, तर रायगड लोकसभा मतदार संघात 54 मतदारांचा समावेश आहे. दापोली मतदारसंघात सर्वाधिक 38 मतदार आहेत. त्यामध्ये 34 पुरुष, तर चार स्त्री मतदार आहेत. पेण मतदार संघात चार पुरुष, श्रीवर्धनमध्ये तीन महाड मतदार संघात तीन पुरुष आणि एका स्त्री मतदार आहेत. तसेच गुहागरमध्ये पाच पुरुष मतदार आहेत. एकूण 49 पुरुष आणि पाच महिला एनआरआय मतदार आहेत.
हे मतदार आता रायगड लोकसभेतील मतदारांचे भविष्य निश्चित करणार आहेत. या मतदारांना उमेदवार कशा प्रकारे संपर्क करतात, त्यांची कशी खातीरदारी करतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.