पेण | वार्ताहर |
तलाठी सजा कार्यालय फक्त शोभेची वस्तू बनले असल्याचे चित्र आहे. कामासाठी आल्यानंतर येथे केवळ कार्यालयाचा फलक दिसतो. मात्र, कार्यालय कधीही बंदच राहत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेत गावात तातडीने कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
वडखळ,वाशी,उंबर्डे,तरणखोप,कामार्ली,हमरापूर,जिर्णे,आंबेघर,बोरगाव,गागोदेबुद्रुक,वाशीवली,आमटेम,कोलेटी,शिहू,बेणसे,पाबळ,कासू,खारपाले,गडब,काराव,वडखळ,बोरी,शिर्की,वढाव,भाल, बोर्जे, वडगाव, कांदळे,पेण,जिते,वलक,दादर,सोनखार या सजांच्या परिसरातील ग्रामस्थांना सातबारासह जमिनीचा दाखला काढणे, वाटणी पत्रक करणे, हक्कसोड करणे, फेरफार नक्कल, बोजा चढविणे व उतरविणे, निराधार योजना, दिव्यांग योजना, उत्पन्नाचा दाखला आदी कामे, तलाठी सजामध्ये येत नसल्यामुळे खोळंबली आहेत. आठवडयातून एखादा दिवसत तलाठी हजर होतात. तेव्हाही नेटवर्कचे कारण सांगून गा्रमस्थांची कामे टाळली जातात. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी तालुकापातळीवर चकरा माराव्या लागत आहेत.
15 ते 18 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शेतकर्यांना आपली शेतातील कामे सोडून तर मोलमजुरी करणार्यांना रोजंदारीची कामे सोडून तालुक्याला चकरा माराव्या लागत असल्याने दुहेरी भुदंड सहन करावा लागतो. यामुळे तलाठयाबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण होत आहे. तलाठी हे तालुक्याच्या ठिकाणाहून आठवडयाला अपडाउन करतात.
जिर्णे सजाचा ऑफिस हा पेण प्रॉयव्हेट हायस्कूल येथे आहे. जिर्णोवरून एखादया शेतकर्याला कार्यालयात यायचे झाले तर जवळपास 24 किलोमीटर अंतर वळसा घालून यावा लागतो भौगोलिक दृष्टया जिर्णे सजाचा कार्यालय चुकीच्या ठिकाणी असून डोंगर दर्यातून पायपीट करत यायचे झाले तरी दोन ते अडीच तास चालावे लागत आहे. तसेच निम्म्याहून अधिक तलाठी हे याच कार्यालयात बसलेले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच तलाठयांची संख्या कमी असल्याने दोन, दोन सजे संभाळणारे तलाठी तर आयडीयाची कल्पना लढवून सर्वसमान्य जनतेला आज माझा वार नाही मी दुसर्या सजेवर आहे असे सांगून अक्षरः वेडे करण्याचे काम करत आहेत.
शेतकर्यांची किंवा विदयार्थी, वयोवृध्द, दिव्यांग, विधवा महिलांची कामे असल्यास ते तलाठयाला फोन करून संपर्क करतात. तेव्हा गावात नेटवर्कची रेंज नसल्याचे कारण पुढे करत तालुक्याच्या ठिकाणी येण्याचे सांगतात. त्यामुळे गावपातळीवरील होणार्या कामासाठी तालुकापातळीवर चकरा माराव्या लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच नव्याने आलेला तहसीलदार यांना पूर्ण तालुक्याची हवी तशी माहिती झालेली नाही. याचाही गैरफायदा तलाठी घेत आहेत. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी तत्काळ याकडे लक्ष देउन शेतकर्यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.