सुधागड तहसीलदारांना निवेदन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली वाकण राज्य महामार्गावर (क्र.548 अ) सातत्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गंभीर अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या धोकादायक मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी पँथर सेनेने केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास रस्ता रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सुधागड तहसीलदारांना नुकतेच या मागणीचे निवेदन दिले.
काही वर्षांपूर्वी पाली खोपोली वाकण राज्य महामार्गचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाली ते खोपोली या मार्गाचे काँक्रिटीकरण झाले असल्याने या मार्गावरील असंख्य वळणे व चढणं काढण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांची गती बेसुमार वाढली आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत असंख्य वाढ झाली आहे. या अनुषंगाने अपघातांना आळा घालण्यासाठी या मार्गावरील अपघाती क्षेत्र, शाळा, गाव, बाजारपेठा असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवून सूचना फलक लावण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, सुधागड तालुकाध्यक्ष मारुती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सेवक जाधव, आकाश कांबळे व निशांत पवार उपस्थित होते.
इथे हवेत गतिरोधक
निवेदनात गतिरोधक आवश्यक असलेल्या ठिकाणांची नावे दिली आहेत. पाली खोपोली दरम्यान चिवे गावाजवळ म्युझिक सिटी (ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात), खुरावले फाटा ( पेण सुधागड मतदार संघ असलेल्या पेण तालुक्याला जोडतो) पेडली बाजारपेठ, जांभूळपाडा हायस्कुल, नाणोसे गाव, राबगाव अशा अपघाती क्षेत्र असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी पँथर सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
वेळ वाचविणारा मार्ग
पाली खोपोली वाकण या मार्गाचा वापर पर्यायी मार्ग म्हणून कोकणवासी करतात. मुंबई पुणे द्रूतगती मार्ग (एक्सप्रेस हायवे ) हा खोपोली पाली फाटा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गला जोडतो, त्यामुळे ठाणे, मुंबईहुन गोवा व कोकणात जाण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचतो. समुद्रकिनारी व पर्यटनस्थळी सुट्ट्यांमध्ये कोकणात फिरण्यासाठी पर्यटक पाली खोपोली वाकण या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून वाहनांची रहदारी कायम असते. व वेगवान वाहनांमुळे अपघात वाढतात. तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे देखील आहेत यामुळे सुद्धा अपघात घडतात.







