अटल सेतूवर वाढीव गस्त

वाहतूक पोलिसांची बेशिस्त वाहनांवर कारवाई


| उरण | प्रतिनिधी |

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवर न्हावा शेवा वाहतूक पोलिसांनी आठवडाभरात 650 बेशिस्त वाहनांवर कारवाई केली. यामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी या सेतूवर वाहन संख्या वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी गस्त वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. अटल सेतूपैकी 10.4 ते 19.6 किलोमीटरचा मार्ग न्हावा शेवा वाहतूक पोलीस हद्दीत येत आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी या ठाण्याकडे आहे. गव्हाण, शेलघर टोलनाका / शिवाजीनगर टोल यांचाही समावेश आहे. उद्घाटनानंतर सेतूवरच सेल्फी काढण्यासाठी वाहने थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सेतूवरून प्रवास करताना नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई सुरू केली आहे.

सेतूवर चारचाकी वाहनांसाठी वेग-मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आली आहे. तसेच या पुलावर विनाकारण थांबण्यास आणि वाहन उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वाहने सेतूवर उभी करून वाहनातून खाली उतरून सेल्फी काढतात. या गंभीर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे न्हावा शेवा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले.

1500 रुपयांपर्यंत दंड
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी 500 ते 1500 रुपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी दोन पथके दिवस-रात्र कार्यरत आहेत. या पथकातील पोलिसांवर मनुष्यबळ कमी असल्याने ताण पडत आहे. त्यासाठी 100 वॉर्डनची, वाहतूक पोलिसांसाठी निवारा शेड तसेच गस्तीसाठी दोन वाहनांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Exit mobile version