| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे अंतर्गत क्षेत्रीय पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या समतादूत प्रकल्पातील मनुष्यबळाचे समाज कल्याण विभागात समायोजन व्हावे, या प्रमुख मागणीसाठी प्रकल्प अधिकारी व समतादूतांचे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच तळागाळातील वंचित शोषित घटकांपर्यंत समाज कल्याणच्या योजनांचा प्रचार प्रसार व अंमलबजावणी करण्याचे प्रामाणिक पणे काम करत असलेल्या, समतादूत प्रकल्पातील मनुष्यबळाचे समाज कल्याण विभागात समायोजन करण्यासाठीची मुख्य मागणीसाठी आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना अनुसूचित जातीसाठी विविध योजना महाराष्ट्रातील वंचित घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर महाराष्ट्र शासनाची व सामाजिक न्याय विभागाची कुठल्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नसुन मागील 8 (आठ) वर्षापासून बार्टीच्या माध्यमातून समतादूत मनुष्यबळ सदरील विभागाच्या विविध योजना प्रभाविपणे राबविण्याचे काम करीत नागरीकांच्या समस्या दूर करणासाठी परिश्रम घेत आहेत. शासनाच्या व सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांना समाज कल्याण विभागात समायोजन केल्यास हा निर्णय अनुसूचित जातीतील व गरजू नागरिकांसाठी लोककल्याणकारी ठरू शकतो म्हणून राज्यभरातील समतादूत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. राज्य शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी समतादूत करीत आहेत.