इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने थोड्याच वेळापूर्वी आपला संघ जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ यावेळी जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. भारताचा उपकर्णधार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असणार आहे. या संघात तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक लोकेश राहुलचा आहे. राहुलबरोबर के एस भरत आणि ध्रुव जुरेल या दोन यष्टीरक्षकांचा समावेश या संघात करण्यात आला आहे. या संघात शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे दोन युवा सलामीवीर असतील. पण सलामीला रोहित शर्मा येणार असल्यामुळे या दोघांपैकी एकालाच सलामी करण्याची संधी मिळेल. या संघातून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना पुन्हा बाहेर ठेवण्यात आले आहे. संघात मधल्या फळीची जबाबदारी ही विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असेल. त्यांच्या मदतीला तिसऱ्या स्थानावर गिलला संधी देण्यात येऊ शकते. या संघात तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवसारखा फिरकीपटूही या संघात आहे. या संघात चार वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

Exit mobile version