श्रेयस अय्यर मालिकावीर
मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईकर श्रेयस अय्यरने साकारलेल्या सलग दुसर्या अर्धशतकामुळे (44 चेंडूंत नाबाद 74) भारताने दुसर्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर सात गडी आणि 17 चेंडू राखून वर्चस्व गाजवले. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेले 184 धावांचे लक्ष्य भारताने 17.1 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. उभय संघांत रविवारी तिसरा सामना खेळवण्यात येईल.
भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा (1) आणि इशान किशन (16) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. मात्र, श्रेयस आणि संजू सॅमसन (25 चेंडूंत 39) यांनी अप्रतिम फलंदाजी करत भारतीय ट्वेन्टी-20 संघात स्थान पक्के करण्यासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली. त्यांनी तिसर्या गडयासाठी 84 धावांची भागीदारी रचल्यावर सॅमसनला लाहिरू कुमाराने बाद केले. श्रेयस आणि रवींद्र जडेजा (18 चेंडूंत नाबाद 45) यांनी मग 58 धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताचा विजय सुनिश्चित केला. श्रेयसने 44 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद 74 धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, श्रीलंकेने 20 षटकांत 5 बाद 183 अशी धावसंख्या उभारली. पथुम निसंका (53 चेंडूंत 75) आणि दनुष्का गुणथिलका (29 चेंडूंत 38) या सलामीवीरांनी श्रीलंकेच्या डावाची दमदार सुरुवात केली. मग भारतीय गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे श्रीलंकेने 35 धावांत चार गडी गमावले. मात्र, निसंका आणि कर्णधार दसुन शनका (19 चेंडूंत नाबाद 47) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत श्रीलंकेला 180 धावांचा टप्पा पार करून दिला.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 20 षटकांत 5 बाद 183 (पथुम निसंका 75, दसुन शनका नाबाद 47; जसप्रीत बुमरा 1/24) पराभूत वि. भारत : 17.1 षटकांत 3 बाद 186 (श्रेयस अय्यर नाबाद 74, रवींद्र जडेजा नाबाद 45; लाहिरू कुमारा 2/31)