। मुंबई । वृत्तसंस्था ।
सुदानमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले होते. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान 47 प्रवशांना शुक्रवारी 5 मे रोजी मायभूमीत परतले आहे. सुदानमध्ये लष्करी आणि निमलष्करी दलामध्ये सुरु असलेल्या हिंसाचारातून भारतीय नागरिकांना मायभूमीत परत आणण्यासाठी 24 एप्रिल रोजी ऑपरेशन कावेरी सुरु केले. भारतीय वायुसेनेचे के.सी 130 हे विमान शुक्रवारी भारतीयांना घेऊन परत आले त्याच बरोबर भारताच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमधून 3,862 नागरिकांना सुखरुप मायदेशात आणले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांना दिली आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या 17 विमानांनी सूदान मधून उड्डाण करत सौदी अरेबियाच्या जेद्दा विमानतळापर्यंत भारतीयांना सुखरुप पोहचवण्यासाठी जवळपास पाच फेऱ्या मारल्या आहेत. सुदानच्या सीमेवर असणाऱ्या देशातून जवळपास 86 भारतीयांना परत आणण्यत आले आहे. तसेच जे भारतीय नागरिक सुखरुप सौदी अरेबियामध्ये पोहचले त्यांना आवश्यक ती मदत केल्यामुळे भारताने सौदी अरेबियाचे देखील आभार मानले आहेत. तसेच भारताने फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, संयुक्त अरब या देशांचे देखील आभार मानले आहेत. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात सर्व भारतीयांच्या घेतलेली सुरक्षेची जबाबदारी आणि त्याची वचनबद्धता हीच आमची प्रेरणा आहे.” केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सौदी अरेबियात उपस्थित होते. याबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मुरलीधरन यांचे कौतुक केले.
“ऑपरेशन कावेरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या धैर्याचे कौतुक आहे. खार्तूम येथील भारताच्या दूतावासाने या कठीण काळात चांगले सहकार्य केले आहे. सौदी अरेबियात तैनात टीम इंडिया आणि भारताशी समन्वय साधणाऱ्या MEA रॅपिड रिस्पॉन्स सेलचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.”
डॉ. एस जयशंकर
परराष्ट्र मंत्री