संधीसाधूंच्या गर्दीत सच्च्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष
| रसायनी | प्रतिनिधी |
राजकारणात एकेकाळी निष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व होते. तो काळ असा होता की, केवळ पक्षाच्या विचारधारेवर आणि आपल्या आवडत्या नेत्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ते स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करायचे. विशेष म्हणजे, पक्षाला आणि नेत्यालाही या त्यागाची आणि कष्टाची जाण असायची. आपला कोणताही कार्यकर्ता नाराज, होणार नाही, याची विशेष काळजी नेत्यांकडून घेतली जात असे. याच आपुलकीपोटी कार्यकर्ता निष्ठेने पक्षाचे काम करत असे.
मात्र, सध्याच्या काळात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आजही असे अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ मनात न ठेवता पक्षाचे हित सर्वोच्च मानून काम केले आहे. पण, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी पक्षांतरे करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. या आयाराम-गयारामांमुळे निष्ठेने काम करणारा मूळ कार्यकर्ता मात्र मागे पडत चालला असल्याची प्रचिती रसायनीत दिसत आहे.
दुर्दैवाने, आज खरा कार्यकर्ता उपेक्षित राहत आहे. स्थानिक नेत्यांच्यात वावरणारे, केवळ त्यांची जी हुजरेगिरी आणि वाहवा करणारे कार्यकर्तेच सध्या पुढे जाताना दिसत आहेत. सर्वच कार्यकर्ते पक्षात केवळ आर्थिक लाभासाठी आलेले नसतात. समाजासाठी, पुढील पिढीसाठी आणि पक्षासाठी काहीतरी ठोस, चांगले काम करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा असते असे रसायनीतील एका निष्ठावंत कार्यकर्त्याने बोलून दाखवले. ही परिस्थिती सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पक्षाचा कणा असलेला सच्चा कार्यकर्ता जर दुखावला गेला, तर भविष्यात पक्षाला मोठ्या अडचणींचा (समस्यांचा) सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पक्षांनी वेळीच आत्मपरीक्षण करून निष्ठावंतांना बळ देणे आवश्यक आहे.






