। पाली/बेणसे । वार्ताहर ।
संत वचनांचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने पनवेल येथील सुप्रसिद्ध चित्रकार, कवी, सुलेखनकार व अभंगाक्षरेकार प्रकाश पाटील हे मागील वर्षभरापासून एक अभिनव उपक्रम राबवित आहेत. सुंदर व सृजनशील चित्राकृतींचे कोंदण जडवलेली संत वचनांची ‘अभंगाक्षरे’ तयार करून समाज माध्यमांवर नित्यनियमाने पाठवीत आहेत. या अनोख्या संतवचनांनी महाराष्ट्रातील लाखो लोकांची सकाळ भक्तीमय होत आहे. संतांचा सहवास त्यांच्या वांड़मयाच्या माध्यमातून लाभावा आणि मन व डोळे दोन्ही तृप्त व्हावे आणि आपले जीवन सफल व्हावे या उद्देशाने प्रकाश पाटील हा अभिनव उपक्रम राबवित आहेत. संतविचार दृढ व्हावा व त्यातून संतांच्या विचारांची अनुभूती आपल्याला मिळावी, हाच हेतू प्रकाश पाटील यांचा आहे.
संत साहित्य अभ्यासक शरद कांतीलाल शिंपी सांगतात की प्रत्येक सकाळ भक्तीमय करणारी ‘अभंगाक्षरे’ महाराष्ट्रभर दररोज सकाळी हजारो लोक, संतांचे अभंग पाहतात, वाचतात आणि त्याच श्रद्धेने इतर लोकांना सादर व भक्तिभावाने पाठवतात. हा आनंदाचा व्यवहार भक्तीच्या माध्यमातून द्विगुणित करतात. कारण संत वचनांनी दृष्टी मिळत असते. हेच संतांचे अपार उपकार आहेत. आपले जीवन सफल व्हावे, असे वाटत असल्यास संतांचा सहवास त्यांच्या वांड़मयाचा ध्यास असावा. असे झाल्यास सफलता आपला श्वास होईल आणि आपले जीवन कृतकृत्य होईल. हाच संतांचा सुद्धा विचार आहे. म्हणूनच संतांच्या भावपूर्ण अशा अभंगांना साजिरे, गोजिरे, अगदी विलोभनीय रुप देऊन रसिकांपर्यंत, भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गेले वर्षभर नित्यनेमाने अभंगाक्षरे या नावाने प्रकाश पाटील अविरतपणे करीत आहेत. आणि या माध्यमातून त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाची सेवा रोज प्रातःकाली होत आहे. हा उपक्रम अव्याहत अखंड सुरूच आहे. दररोज प्रातःकाळी एक सुंदर कलाकृती ‘अभंगाक्षरे’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो वारकरी, विठ्ठलभक्त, संतप्रेमी, भाविक यांच्या फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम तसेच अनेक व्हाट्सअप समुहावर त्या दिवसाचा सुलेखन प्रकारात लिहिलेला संतांचा अभंग वा ओवी झळकत असते. खरतर या लाखो अभंग प्रेमींना आता याची सवयच झाली आहे. ती इतक्या प्रमाणात झालेली आहे की, एखाद्या वेळी काही तांत्रिक कारणास्तव ‘अभंगाक्षरे’ प्रसारित करण्यास उशीर झाला तर चाहते प्रकाश पाटील यांना लघुसंदेश वा दूरभाष्य करून आपली तगमग व तळमळ व्यक्त करतात.
संत साहित्याचा गाढा अभ्यास
संतांचे अभंग सुलेखन प्रकारात रेखाटताना, त्यात काही पाठभेद, चुका होऊ नयेत यासाठी प्रकाश पाटील हे सकल संत गाथा, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथांचा गाथा, ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा, अशा अनेक संदर्भग्रंथाचा सुलेखन करताना आधार घेतात. याचे कारण म्हणजे सश्रद्ध, वाचक व वारकरी यांचा अभंगाबद्दलचा अभ्यास अतिशय गाढा असतो. हे लक्षात घेऊन त्यात कोणत्याही प्रकारे लिहिताना चूक होऊ नये म्हणून त्यांचे दोन तीन वेळा वाचन करून, खात्री केलेली असते व नंतरच ते प्रसारमाध्यमांवर प्रसारित होते.
‘अभंगाक्षरे’ रोज लाखोंच्या भेटीला; चित्रकार प्रकाश पाटील यांचा अभिनव उपक्रम
