। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
ढोकळेवाडी फाटा ते चंदरगाव हा अंदाजे सहा किलोमीटरचा रस्ता गेली वीस-बावीस वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या विषयावर ठोस आवाज उठवताना दिसत नाहीत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जंगल परिसरातून जाणारा हा रस्ता असल्याने वाहनचालकांना धोके निर्माण होतात. रस्त्यावर जागोजागी मोठे दगड बाहेर आले असून त्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना वाहनांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून प्रवास सुलभ करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.







