राज्यात 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली आहेत. काही ठिकाणी आंदोलनं शांततेत पार पडली आहेत. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. महाराष्ट्रात आंदोलकांकडून काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय. तर काही ठिकाणी जाळपोळच्या घटनादेखील घडल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आरोपींना अटक देखील केलीय, असं पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं.

आतापर्यंत संभाजीनगर परिक्षेत्रात 29 ते 31 ऑक्टोबर तारखांच्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 7 गुन्हे हे कलम 306 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

कायद्याचं उल्लंघन करणारे, सार्वजनिक मालेमत्तेच नुकसान करणारे, तसेच जाळपोळ करणाऱ्या असामाजिक तत्व यांच्यावर पोलीस कडक कारवाई करेल. तसेच शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी, असं रजनीश शेठ म्हणाले.

या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद
बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. तसेच बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे. महाराष्ट्रात 24 ते 31 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 141 गुन्हे दाखल झाले आहेत आणि 168 आरोपींना अटक केली आहे. तर 146 आरोपींना कलम 41 नुसार नोटीस देण्यात आली आहे, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं.

12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान
संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय. ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ दिलेलं आहे. आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपनी आम्ही वेगवेगळ्या घटनांना दिले आहेत. तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सची कंपनी बीड जिल्ह्यात दाखल झालीय. सात हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

Exit mobile version