महामार्गाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- नाना पटेोले

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास 17 वर्षांपासून सुरु आहे मात्र हा रस्ता पूर्ण होत नाही. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, भाजपाचे लोकच या रस्त्याच्या कंत्राटात भागीदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (दि.28) मुंबई येथे केला.

कमीशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले आणि त्याचा फटका मात्र कोकणच्या लोकांना बसत आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करावी म्हणजे, ‘दूध का दूध, पानी का पानी होईल’.

नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्व आहे. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत, भाजपाकडेच या पदासाठी उमेदवार नाही. नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुलजी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे.असे ते म्हणाले.

ईडीच्या भीतीने सरकारात
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपाशी हातमिळवून सत्तेत सहभागी झाले ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते मग त्यांनी काय विकास केला ते सांगावे.

‘शासन आपल्या दारी’ अभियानावर जनतेच्या पैशाची लुट चालली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील योजनाच हे सरकार राबवत आहे आणि त्याचे श्रेय मात्र स्वतः लाटत आहे. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो, तिथली जनता सरकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करते, असेही नाना पटोले म्हणाले.

Exit mobile version