भाजपवर साधले टीकास्त्र
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना महाराष्ट्राने पसरवला, असे सांगत लोकसभेत महाराष्ट्राला पंतप्रधानांनी बदनाम केले. महाराष्ट्राची बदनामी काँग्रेस कधीही सहन करणार नाही. काँग्रेसवर टीका करून हे सत्तेत आलेत. आजही तेच करत आहे. हे काँग्रेसमुक्त करू इच्छितात. मात्र, जनताच देशाला भाजपमुक्त करेल आणि हे कधी झाले, हे यांना कळणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नुकताच काँग्रेसमध्ये मेगा भरती झाली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच मालेगावमध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या कार्यकर्त्यांबाबत देखील पटोलेंनी प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले की, ही तर झाकी आहे. राज्यात महाविकास आघाडी पक्षाचे सरकार आहे. पण, पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येकालच आहे. मालेगाव, भिवंडीमध्ये जे झाले त्याचा राग आहे. पण द्वेष नाही. आम्ही कोणाला प्रलोभन देत नाही. कोणाशी स्पर्धा करत नाही.
तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी समन्वयाने वागावे. समन्वयाने चालावे ही भूमिका होती, मात्र एखाद्या मोठ्याने मोठ्या पद्धतीने राहिले तर सन्मान होतो. मोठाच जर थोडस चुकीचं करत असेल तर लहानही चुका करायला मोकळा असतो, हा संदेश या निमित्ताने आम्ही दिला आहे, असं नाना पटोले म्हणाले.
भाजपला सत्तेचा रोग
भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेच सरकार गेलं तेव्हापासून भाजपचे मानसिक संतुलन बिघडले आहे. बेताल वक्तव्य करून राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे. हे नेते आरएसएसमध्ये मोठे झाले आणि पदवार बसले. आरएसएसची ही संस्कृती आहे का? हिंदुस्थानची ही संस्कृती आहे का? असे सवाल उपस्थित करत नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला.