एका विहिरींसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान
| रायगड । सुयोग आंग्रे ।
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी 15 किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये असणार्या 806 ग्रामपंचायतींमध्ये 12 हजार 90 सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी 1321 सिंचन विहिरी बांधून पूर्ण झाल्या आहेत. 10 हजार 769 सिंचन विहिरी बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंचन प्रकल्पावर अवलंबून न राहता वैयक्तीक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकर्य़ांकडे असावेत आणि सिंचनाबाबत शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी मनरेगातून या विहिरी घेण्यात येणार आहेत. शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतात तसेच या योजनेंतर्गत विहिरींच्या कामासाठी 100 दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर तर अतिरिक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्यस्तरावर देण्यात येणार आहे. या योजनेमुळे खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणार्य़ा शेतीबरोबरच उन्हाळ्यातही सिंचनासाठी शेतकर्य़ांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यात 806 ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 15 सिंचन विहिरी म्हणजेच 12 हजार 90 सिंचन विहिरींची खोदाई करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शेतीसाठी लागणार्य़ा पाण्याची कमतरता भासणार नाही. वैयक्तीक सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी हॉल्टिकल्चर अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपवर नोंदणी करून शेताच्या बांधावरूनच शेतकरी सिंचन विहिरीची मागणी करू शकतात. सिंचन विहिरीसाठी किमान 40 गुंठे जागा असावी; मात्र, 40 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर शेजारील सलग क्षेत्र घेऊन संयुक्त सिंचन विहीर बांधण्याचा लाभ शेतकर्य़ांना देण्यात येणार आहे.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमध्ये 930 सिंचन विहिरी, कर्जत 55 ग्रामपंचायतींमध्ये 825 विहिरी, खालापूर 44 ग्रामपंचायतींमध्ये 660 विहिरी, महाड 134 ग्रामपंचायतींमध्ये 2010 विहिरी, माणगाव 73 ग्रामपंचायतींमध्ये 1095 विहिरी, म्हसळा 39 ग्रामपंचायतींमध्ये 585 विहिरी, मुरूड 24 ग्रामपंचायतींमध्ये 360 विहिरी, पनवेल 69 ग्रामपंचायतींमध्ये 1035 विहिरी, पेण 63 ग्रामपंचायतींमध्ये 945 विहिरी, पोलादपूर 42 ग्रामपंचायतींमध्ये 630 विहिरी, रोहा 64 ग्रामपंचायतींमध्ये 960 विहिरी, श्रीवर्धन 43 ग्रामपंचायतींमध्ये 645 विहिरी, सुधागड 34 ग्रामपंचायतींमध्ये 510 विहिरी, तळा 25 ग्रामपंचायतींमध्ये 375 विहिरी आणि उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये 525 सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यात 182 सिंचन विहिरी, कर्जत 105 विहिरी, खालापूर 78 विहिरी, महाड 84 विहिरी, माणगाव 75 विहिरी, म्हसळा 34 विहिरी, मुरूड 64 विहिरी, पनवेल 75 विहिरी, पेण 115 विहिरी, पोलादपूर 214 विहिरी, रोहा 51 विहिरी, श्रीवर्धन 24 विहिरी, सुधागड 141 विहिरी, तळा 76 विहिरी आणि उरण तालुक्यात 3 सिंचन विहिरी बांधण्यात आल्या आहेत.
हे पात्र लाभार्थी असतील शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक जमीन किमान 40 गुंठे असावी. शेतकर्य़ाकडे जॉबकार्ड असणे आवश्यक राष्ट्रीयीकृत बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे नवीन विहिरीसाठी जागा जुन्या विहिरीपासून 500 फूट असावी. भूजल सर्वेक्षण दाखल्याची गरज नाही.
रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी शासनाने सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सिंचन विहिरींचे बांधकाम मनरेगा अंतर्गत करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर या विहिरी बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 1289 सिंचन विहिरी बांधण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. या विहिरींमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून त्याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे.
केदार शिंदे
नायब तहसीलदार
रोजगार हमी विभाग





