जय शाह यांनी दिली महत्त्वाची माहिती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे संघाचे प्रमुख खेळाडू दुखापतीच्या समस्येने त्रस्त आहेत. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत हार्दिकला दुखापत झाली होती, तर शमीला घोट्याच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे दोघेही संघाबाहेर आहेत. त्यांचा संघात परतण्याचा मुहूर्त ठरला असून, याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माहिती दिली.
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याचा समावेश केलेला नाही, मात्र मोहम्मद शमीला दुखापत बरी झाल्यास खेळण्याची संधी दिली जाऊ शकते, असे जय शहा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हार्दिक पांड्या बरा होत असून, तो अफगाणिस्तान मालिकेत संघात खेळू शकतो. जानेवारीमध्ये भारतीय अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 11, 14 आणि 17 जानेवारीला खेळवली जाणार आहे. त्या मालिकेत हार्दिक पांड्याचे पुनरागमन होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. तर जय शाह यांनी मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल माहिती देताना सांगितले की, दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान शमी तंदुरुस्त होऊ शकतो. त्यामुळे पांड्या आणि शमी लवकरच भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.