कोलमांडला येथील जलजीवन मिशन योजना अपूर्ण
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा फटका
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली नळ पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे व निकृष्ट दर्जामुळे पूर्णपणे ठप्प झाली असून, अयशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, गावातील हर घर जलचे स्वप्न कागदावरच राहिले असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या शासकीय पत्रांनुसार, संबंधित खालापूर येथील कंत्राटदार तेजस कऱ्हाळे यांनी करारातील अटींचा भंग करत काम वेळेत पूर्ण केलेले नाही. कामाच्या ठिकाणी विहीर साफ करणे, लोखंडी तारा काढणे, पंपाचे काम, वितरण व्यवस्थेतील जलवाहिनी गळती काढणे, उंच साठवण टाकीचे झाकण-शिडी बसवणे आणि पीसीसी करणे यांसारखी अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. योजना 95 टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र कामाचा दर्जा अत्यंत असमाधानकारक आणि अपूर्ण असल्याचे उघडकीस आले आहे.
रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, श्रीवर्धनकडून कंत्राटदाराला अनेकदा स्मरणपत्रे पाठवण्यात आली. प्रत्यक्ष पाहणी आणि बैठकांना कंत्राटदार अनुपस्थित राहिल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. कामाचा दर्जा असमाधानकारक असून, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा व दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच, योजनेचे काम अपूर्ण असल्याने ग्रामपंचायतीने ती हस्तांतरित करून घेण्यास नकार दिला आहे. थकबाकी असलेल्या विजेच्या बिलाची जबाबदारीही हस्तांतरण न झाल्यामुळे प्रलंबित असून, योजना बंद पडल्यास कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा दिला गेला आहे. या कारभारामुळे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून ही नळ पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी कोलमांडलावासीयांकडून होत आहे.
कंत्राटदाराला अनेकदा स्मरणपत्रे पाठवण्यात आली. प्रत्यक्ष पाहणी आणि बैठकांना कंत्राटदार अनुपस्थित राहात आहे. कामाचा दर्जा असमाधानकारक असून, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्यात येईल. संबंधित कंत्राटदाराला उर्वरित कामे लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.
– उदय पाटील, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा, राजिप, श्रीवर्धन
जलजीवन योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवणे हा आहे. मात्र, कामात होत असलेली दिरंगाई आणि अपूर्ण अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाचा निधी खर्च होऊनही जर काम पूर्ण होत नसेल आणि नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे.
– प्रसाद बारे, ग्रामस्थ, कोलमांडला
