25 हजार नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा
| चिरनेर | प्रतिनिधी |
निधी अभावी रखडलेली 11 कोटींची जलजीवन योजना, शासनाची विविध प्रकारची अपूर्ण राहिलेली कामे, जुन्या गळक्या जलवाहिन्या आणि पुनाडे धरणाने तळ गाठल्याने उरण तालुक्यातील आठ गावांतील 25 हजार नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
उरण पुर्व विभागातील पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कडापे इत्यादी 25 हजार लोकसंख्येच्या गावातील नागरिकांना पुनाडे धरणातून पाणी पाणीपुरवठा केला जातो. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाच्या जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या सातत्याने फुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तसेच, आधीच गळती लागलेल्या पुनाडे धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे या गावांतील रहिवाशांना करण्यात येत असलेला पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
उरण पुर्व विभागातील आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने 2022 साली 11 कोटींची जलजीवन योजना मंजूर करून घेतली होती. त्यामध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, 8 इंच व्यासाची नवीन पाईप लाईन टाकणे, सौर पॅनल इत्यादी दुरुस्ती व नवीन कामांचा समावेश होता. 2024 पर्यंत या जनजीवन योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी सर्वच कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यानेच निधीच्या कमतरतेमुळे जनजीवन योजना मागील 4 वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील आठ गावांतील 25 हजार नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असुन, संताप व्यक्त केला जात असल्याची माहिती सरपंच तथा पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीच्या सदस्या अनामिक म्हात्रे यांनी दिली.
निधीच्या कमतरतेमुळे जनजीवन योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेले पुनाडे पाणी पुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे. दरम्यान, योजनेच्या खर्चासाठी अतिरिक्त आणखी 1 कोटीची वाढ करण्यात आली आहे. पुनाडे पाणी पुरवठा योजनेतून आतापर्यंत नवीन तसेच दुरुस्तीची 78 टक्के कामे झाली आहेत. योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गुरुवारी (दि.21) बैठकही आयोजित करण्यात आली होती.
प्रशांत पांढरपट्टे,
उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
पुनाडे धरणाची गळती-दुरुस्ती व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यापुर्वी ही कामे पूर्ण करण्यात येईल.
मिलिंद पवार,
कार्यकारी अभियंता, इरिगेशन विभाग
