| रायगड | प्रतिनिधी |
कृषी उत्पादनात भौगोलिक निर्देशांक अर्थात जीआय मानांकन हे बदलापुरात उत्पादित होणाऱ्या जांभळांना मिळाले आहे. त्यामुळे आता बदलापूर हे देशातील जांभळाचे गाव म्हणून नावरूपाला येणार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शेती अभ्यासक आणि जांभूळ परिसंवर्धन ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
आपल्या विशेष आंबट-गोड अशा चवीमुळे मुंबई, उपनगर तसेच अनेक शहरांत लोकप्रिय असलेल्या बदलापूर येथील जांभळांना अखेर भौगोलिक मानांकन मिळाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतर ठाणे जिल्ह्यात मिळालेले हे पहिले भौगोलिक मानांकन आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अगदी संशोधकांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून बदलापूरच्या या जांभळाचे औषधी गुणधर्मसुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे इतरत्र उपलब्ध होणाऱ्या जांभळापेक्षा चव व आकारात बदलापूर येथे उत्पादित होणारे जांभूळ हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, चेन्नईमधून भौगोलिक मानांकन रजिस्ट्रीमधून ही माहिती मिळाली असून, आता सरकारी गॅझेटमध्ये याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आदित्य गोळे यांनी दिली आहे.
वीस गावांतून जमवला डाटा
बदलापूर परिसरातील जवळपास 20 गावांतील अंदाजे 1200 झाडे शोधून त्या आधारे डाटा गोळा करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टपोरा, रसदार आणि थोडा आंबट-गोड चवीच्या बदलापूरच्या हलवी आणि गरवी जातीच्या जांभळाची आता जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे भौगोलिक मानांकन प्राप्त होणारे बदलापूर जांभूळ हे देशातील पहिले जांभूळ आहे.