आरक्षणासाठी थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा इशारा
। बीड । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आता आरक्षण प्रश्नावरून कोणालाही विनंती करणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. तसेच, आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणारच, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासोबतच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिर्डीमध्ये एकदा विनंती केली होती, तुमचा माणूस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतोय. खोट्या केस करतोय, हे थांबवा. मराठ्यांना सग्या सोयऱ्यातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी दोनदा केली. मी पण क्षत्रीय मराठा आहे, आता पुन्हा विनंती करणार नाही. मराठ्यांना 6 जूनपर्यंत आरक्षण दिलं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आणि महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार’, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठ्यांच्या एकीची भीती स्पष्ट दिसत आहे, इतर राज्यात एकाच टप्प्यात लोकसभा निवडणुका घेतल्या. महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. प्रत्येक ठिकाणी मोदी सभा घेत आहेत, याच्यातच आमचा विजय असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडला. शेवटी व्यासपीठावरील गोंधळ कमी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः हातामध्ये माईक घेऊन कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली जाण्यास सांगितले, तर पोलिसांनी स्टेजवर जमलेल्या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली पिटाळून लावले. अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्याने तारांबळ उडाली होती.