| सोलापूर | प्रतिनिधी |
मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात मात्र मुघलांसारखं राज्य करीत असल्याची टीका शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केली. सोलापूर येथे शनिवारी (दि.2) प्रागतिक पक्ष महाराष्ट्रची पहिली जनजागरण सभा हुतात्मा स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सीपीएमचे कॉ. उदय नारकर, एस.एस.शेख, सीपीआयचे कॉ. सुभाष लांडे, जनता दलचे प्रताप होगाडे, बीआरएसपीचे धीरज बगाडे, समाजवादी पार्टीचे रऊफ शेख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांनी जालना येथे झालेल्या आंदोलकांवर लाठी चार्जचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच गेली नऊ वर्ष मोदी सरकार हुकुमशाही करत असल्याचे सांगत धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यापुढे ते म्हणाले सीबीआय, ईडी या यंत्रणेची दहशत दाखवून, विरोधकांचे फोडाफोडीचे राजकारण करून संविधान बदलण्याचे कारस्थान मोदी सरकारले सुरू केले आहे. सध्या देशात अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी समाज दहशतीखाली आहे. अल्पसंख्यांक समाज सुरक्षित नाही. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. कामगारांवर हल्ले होत आहेत. कामगार कायदे रद्द करून कामगारांची सुरक्षा काढून घेण्याचं काम भाजप सरकार करीत आहे. प्रागतिक पक्षाची आघाडी इंडिया आघाडीचाच भाग आहे. मोदी सरकारच्या अन्यायाला वाच फोडण्याचे काम आघाडी करेल, असेही ते म्हणाले.