समुद्रात जेली फिशचे आक्रमण

मुरुड येथील 500 नौकांची मासेमारी ठप्प
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
दसर्‍या नंतर अचानक समुद्र किनार्‍यावर अत्यंत दाहक अशी जेली फिश आल्याने ऐन मासेमारी सिझनमध्ये मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा, मजगाव, नांदगाव, मुरूड तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, आदगाव, हरवीत, कुडगाव म्हसळा तालुक्यातील वाशी हवेली, तुरबाडी आदी बंदरातून मासेमारीस जाणार्‍या सुमारे 500 नौकांची मासेमारी ठप्प झाल्याची माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार आणि होलसेल मासळी व्यवसायिक धनंजय गिदी यांनी बुधवारी दिली. जेली फिशला कोळी बोली भाषेत आग्या मासळी म्हटले जाते. ही मासळी कोणी खात नाही. मासेमारीस ज्या वेळेस मच्छीमार समुद्रात जातात त्यावेळी जेलिफिश जाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असून या जेलिफिशचा स्पर्श झाल्यास 15 ते 20 तास दाह कमी न होता खाज सुटत राहते. डोळ्यांना स्पर्श झाल्यास डोळे लाल आणि मोठा दाह होतो. समुद्रात मिळणारी अन्य मासळी देखील जेली फिश पासून खूप दूर निघून जाते. जे मच्छीमार मासेमारीस गेले होते ते बहुतेक सर्वजण मासेमारी किनार्‍याकडे तातडीने परतले आहेत.परतलेल्या 10 छोट्या-मोठ्या गावातील सुमारे 500 नौकांचा समावेश आहे.जेलिफिशचे आक्रमण धोकादायक असून ते किती दिवस राहील याचा नेम नसतो, अशी माहिती मच्छीमारांनी दिली.

1 ऑगस्ट पासून मासेमारीस सुरुवात झाली असली तरी अतिवृष्टी, वादळी वारे आणि विविध अडचणीमुळे मासेमारी सतत ठप्प होत होती. मोठी मासेमारी करण्यास संधीच मिळाली नाही. करोडो रुपयांचा डिझेल परतावा महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे. डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मच्छिमारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमारांच्या प्रलंबित समस्या सोडविणे ही काळाची गरज बनली आहे.

जेलिफिशचे आरिष्ट
कोलंबी व मोठ्या मासळीच्या ऐन सिझनमध्ये जेलिफिशचे अरिष्ट आल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान होण्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या संकटामुळे ताजी मासळी फारशी दिसून येत नसून बाहेरगावची आयात मासळी दिसत आहेत. समुद्रातील मानवी प्रदूषण, पर्सनीन मासेमारी, आदी समस्या पारंपरिक मच्छिमारांपुढे आहेतच. अशातूनच मासेमारी करायची म्हणजे नुकसान आणि मोठे आव्हानच उभे ठाकले आहे.

Exit mobile version