गेल्या चार दिवसांपासून ग्राहक संपर्कापासून वंचित
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागात जिओला प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिओकडून चांगली सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महाजनेमध्ये गेल्या चार दिवसांपासून जिओ नॉटरिचेबल आहे. त्यामुळे ग्राहक संपर्कापासून वंचित असल्याचे चित्र दिसून आले आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील जिओ कंपनीकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही.
जिओ कंपनीच्या सिमला बाजारात प्रचंड मागणी वाढली असून, शहरी भागापेक्षा गावे, वाड्यांमध्ये जिओ सिम खरेदीवर ग्राहक अधिक भर देत आहेत. त्यात जिओचा मोबाईल खरेदीकडेही ग्राहक लक्ष देत आहेत. विशेष म्हणजे तरुण वर्गांसह वयोवृध्द ग्राहक जिओला पसंती दर्शवित आहेत. अलिबाग तालुक्यातील महाजने या ठिकाणी जिओ कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे जिओला सिम कार्डला मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. या परिसरात दोनशेहून अधिक ग्राहक आहेत. नेटसह संपर्कदेखील सहज होत नसल्याने ग्राहकांमध्ये जिओबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून महाजनेमध्ये जिओ नॉट रिचेबल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलला रेंज असूनदेखील संपर्क होत नाही. नेट कनेक्टीव्हीची समस्यादेखील निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा होऊ लागली आहे. याबाबत कंपनीच्या काही मंडळींशी संपर्क साधला, असता, कंपनीला याबाबत तक्रार केली आहे. मात्र अद्याप कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर ऋतूराज यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रार दाखल झाली आहे. पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिओची सेवा पुर्ववत सुरु होण्याची आशा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.