। रोहा । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरूद्ध लखीमपूर खेरी येथे आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांना भरधाव गाडीने चिरडण्यात आले. या शेतकर्यांचे अस्थी कलश मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे विसर्जन करण्यात येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबई येथे सामील व्हा, असे आवाहन पंडित पाटील यांनी केले आहे. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात रोहा व मुरुड येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी शेतकर्यांनी संयमाने चालविलेल्या लढ्याला यश आले असून फॅसिस्ट मनोवृत्तीच्या मोदी सरकारला तिन्ही कृषी कायदे मागे घेणे भाग पडले असल्याचे प्रतिपादन पंडित पाटील यांनी केले आहे. अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमप्रसंगी रोहा तालुका चिटणीस राजेश सानप, मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत, गणेश मढवी, अनंत वाघ, कांचन माळी, शिवराम महाबळे, नंदेश यादव, हेमंत ठाकूर, विनायक धामणे, परशुराम वाघमारे, शरद चवरकर यांच्यासह रोहा व मुरुड तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.