माती वाहतूक करणार्या गाड्यांवर कारवाई, ट्रक मालक धास्तावले..
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात गेली दीड वर्षे सुरू असलेल्या लाल माती तस्करी प्रकरणी मोठी कारवाई महसूल विभागाने केली आहे. महसूल विभागाने लाल माती घेऊन निघालेल्या हायवा गाडी मालकांचे हात बांधले असून, त्या गाड्यांमधून पुन्हा अवैध गौण खनिज वाहतूक झाल्यास त्या गाड्यांची स्थिती बिकट होऊ शकते, असे सत्य प्रतिज्ञापत्र ट्रक मालकांकडून लिहून घेण्यात आले आहेत. दरम्यान,अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या तीन गाड्यांवर महसूल उपविभागीय अधिकारी यांच्याकडून बाँड पेपर लिहून घेण्याची कार्यवाही करण्यात आल्याने ट्रक चालक धास्तावले आहेत.
कर्जत तालुक्यात लाल मातीची होणारी तस्करी महसूल विभागाने उघडकीस आणली होती. कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत रात्रीच्या अंधारात लाल मातीची तस्करी करणार्या बारा गाड्या पकडल्या. त्यापैकी लाल मातीने भरलेल्या तीन गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तीन गाड्यांना प्रत्येकी दोन लाख 23 हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र, त्यानंतर या गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यास या गाड्यांमधून होणारी वाहतूक ही अवैध होऊ नये, याकरता तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी आणखी महत्त्वाची कारवाई केली आहे.
महसूल विभागाकडून वेगवेगळ्या दोन कारवाया होत असतात. त्यात तहसीलदार यांच्याकडून बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंडाची कारवाई होते. त्यानूसार कारवाईत साधारण दहा लाखाचा दंड महसूल विभागाने तात्काळ वसूल केला. मात्र त्यानंतर देखील त्या तीन ट्रक मालकांना त्यांचे ट्रक ताब्यात मिळाले नव्हते. ते ट्रक ताब्यात घेण्यापूर्वी महसूल विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कबुली जबाब सत्य प्रतिज्ञापत्र म्हणून लिहून घेण्यात आला.
महसूल विभागाकडून करण्यात येणार्या दंडात्मक कारवाईनंतर प्रांत अधिकारी यांच्याकडून त्या ट्रकमधून पुन्हा बेकायदा आणि अनधिकृतपणे गौण खनिजांची वाहतूक होणार नाही, यासाठी ते बॉण्ड लिहून घेण्यात आला. या कारवाईत तीनही गाड्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यानंतर येणार्या 30 दिवसांमध्ये जर पुन्हा या गाड्यांमधून अवैद्य वाहतूक आढळल्यास लाखो रुपये किमतीच्या या गाड्या स्क्रॅपच्या भावाने जप्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता अवैद्य धंदा करून लाल मातीची चोरटी वाहतूक करणार्या या माती तस्करांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
दरम्यान, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी केलेल्या कारवाईनंतर कर्जत तालुक्यात होणारी लाल मातीची तस्करी काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. महसूल विभागाला कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता अवैधपणे होणारा माती उपसा आणि त्याची वाहतूक ही पुन्हा येत्या काळात सुरू होऊ शकते, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. याच गोष्टीला आळा बसावा, याकरीता कारवाई करण्यात आलेल्या तीन गाड्यांवर डॉ. धनंजय जाधव यांनी बॉण्डची कारवाई केली आहे. आता या तीन गाड्या रस्त्यात बेकायदा वाहतूक करताना आढळल्यास त्या थेट जप्त केल्या जाणार आहेत. यामुळे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या कारवाईनंतर माती तस्करांचे आणि अवैद्यपणे वाहतूक करणार्या गाड्या मालकांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे बॉण्डमध्ये?
वाहन मालक यांच्याकडून प्रांत अधिकारी यांनी सत्य प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असून त्यावर 12 जानेवारी 2018च्या राजपत्रानुसार वाहतूक करताना त्या गाड्यांमधून अनधिकृत गौण खनिज काढण्यासाठी, गौण खनिज त्या जागेवरून दुसर्या जागी हलविण्यासाठी, गोळा करण्यासाठी, दुसर्या जागी उचलून नेण्यासाठी किंवा त्या गौण खनिज यांची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्यांची वाहतूक करता येणार नाही, असे नमूद केले आहे.