अपघात रोखण्यासाठी तातडीच्या दुरुस्तीला सुरुवात; रखडलेल्या रुंदीकरणाचा फटका
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथील चोळई परिसर गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. हा परिसर दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही या ठिकाणी अपघात कमी झालेले नाहीत. 15 दिवसांत याठिकाणी आठ मोठे अपघात झाले असून, ही मालिका सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर दुसर्याच दिवशी परिसरात दोन अपघात झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिस विभागाची संयुक्त पाहणी करून विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी दोन दिवसांपासून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. घाटातून येणारा रस्ता तीव्र उताराचा सिमेंट काँक्रिटचा आहे, तर चोळईतील रस्ता अरुंद, खराब आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला 50 फूट खोल दरी आहे, तर दुसर्या बाजूला नाला असल्याने समोरून पोलादपूरच्या दिशेने वाहने येताना पाहिल्यावर चालकांना ब्रेक दाबावा लागतो. अनेकदा बेक निकामी होत असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटून वाहने दरीत कोसळतात किंवा समोरच्या वाहनांवर धडकतात.
पंधरा दिवसांत कशेडी घाटात आठ गंभीर अपघात झालेले आहेत. आ. योगेश कदम यांचाही अपघात याच ठिकाणी झाला होता. सध्या या रस्त्याचे एल अॅण्ड टी या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी जागा न दिल्याने, ठराविक भागाचे रुंदीकरण झालेले नाही. याचा फटका निष्पाप प्रवाशांना बसतो आहे.
घाटात 8 ठिकाणी ब्लॅकस्पॉट
पोलादपूरपासून गोव्याच्या दिशेने केवळ एक कि.मी. अंतरावर चोळई गावापासून कशेडी घाटातील तीव्र वळणांना सुरुवात होते. साधारणत: कशेडी टॅप वाहतूक पोलिस चौकीपर्यंतचे 12 कि.मी. अंतर आणि तेथून पुढे खेड तालुक्यातील 8 कि.मी.चा कशेडी घाट धोकादायक ठरला आहे. कशेडी घाटात महामार्ग पोलिस आणि महामार्ग बांधकाम विभागाने पाहणी करून काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. साईटपट्ट्यांसह संरक्षण भिंत बांधणे, परिवर्तीत दिशा दर्शक फलक, वळणाची तीव्रता कमी करणे अशी कामे केली जाणार आहेत.
दुहेरी संकट
चोळई गावाजवळचा लहानसा भाग अपघातप्रवण क्षेत्राबरोबर दरडग्रस्तही आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने येथे संरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. कशेडी घाटाच्या सुरवातीला असलेल्या चोळई गावाच्या हनुमान मंदिरालगतच्या संरक्षक कठड्याला धडक देऊन कंटेनर, ट्रक, जीप, व्हॅन आदी वाहने गावातील लोकवस्तीपर्यंत पोहोचली आहे. या गावावर अपघातांची टांगती तलवार कायम राहिली आहे.
रुंदीकरणाचा फटका
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादन रखडल्याने चौपदरीकरण होऊ शकलेले नाही. त्यातीलच एक चोळई भाग आहे. चौपरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करून अपघात कमी करण्याच्या सूचना गणपती उत्सवादरम्यान देण्यात आल्या होत्या; परंतु हे काम पूर्ण झालेले नव्हते. पुढील काही दिवसात पोलिस प्रशासनाने सूचवलेले ब्लॅकस्पॉटची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न कंत्राटदार कंपनीकडून केला जाणार आहे.
तीव्र उतार आणि वळणानंतर खराब रस्ता असल्याने चालकांचे वाहनांवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर अपघातप्रवण भागाची दुरुस्ती केली जात आहे. त्याचबरोबर घाटातील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहेत.
युवराज म्हसकर
पोलिस उपनिरिक्षक, पोलादपूर