सहा महिन्यांत तब्बल 10 लाख कावळे मारण्यात येणार
| नैरोबी | वृत्तसंस्था |
भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल 10 लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केनियन सरकारने घेतलेल्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
केनियन सरकारने या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण दहा लाख कावळे मारण्याचे उद्दीष्ट सरकारतर्फे निश्चित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कावळे हे केनियन परिसंस्थेत तेवढे महत्त्वाचे नाहीत, असे केनियन सरकारचे म्हणणे आहे. केनियम वाईल्डलाईफ सर्व्हिसच्यामध्ये भारतीय कावळा हा परदेशी पक्षी आहे. तो मूळचा केनियन नाही. त्यामुळे किनारपट्टी भागातील शेतकरी आणि हॉटेल व्यवसायिकांसाठी पक्ष डोकेदुखी ठरत आहे, अशी भूमिका मांडत केनियन सरकारने आगामी काही महिन्यांत दहा लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय वंशाचे हे कावळे 1940 च्या आसपास पूर्ण आफ्रिकेत आल्याचे सांगितले जाते. या कावळ्यांमुळे तेथील स्थानिक प्रजातींवर नकारात्मक परिणाम होतो की काय, अशी भीती केनिया तसेच इतर आफ्रिकन देशांकडून व्यक्त केली जाते. यासह या भारतीय कावळ्यांमुळे केनियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम पडत असल्याचे तेथील स्थानिक आणि सरकारचे म्हणणे आहे. केनियन सरकारला पर्यटनातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन व्यवसाय फार महत्त्वाचा आहे. आम्ही लक्ष दिले नाही तर हे कावळे दिवसाला कोंबड्यांची 20-20 पिले घेऊन जाऊ शकतात. याच कारणामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन आता केनियन सरकारने या वर्षाच्या शेवटपर्यंत दहा लाख कावळे मारण्याचे ठरवले आहे.







