। आळंदी । प्रतिनिधी ।
कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी चौधरी यांनी व्यक्त केले. ‘डांगे पंच मंडळ कार्यालय’, आळंदी (पुणे) येथे नुकतेच कीर्तनकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 100 हून अधिक जणांची या कार्यशाळेला उपस्थिती लाभली.
नरहरी चौधरी पुढे म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. वारकरी संप्रदाय आणि समितीने राज्यात एकत्रितपणे अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. आज या कार्यशाळेतून जे ज्ञान मिळेल, ते आपण आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सर्व समाजात पोचवले पाहिजे. अशा प्रकारे कार्यशाळांचे आयोजन ठिकठिकाणी केले पाहिजे.
यावेळी बंडातात्या कर्हाडकर, आत्माराम महाराज, रामचंद्र पेनोरे, पद्माकर पाटोळे, पंडित क्षीरसागर, राम सूर्यवंशी, रघुनाथ बापू चौधरी, आत्माराम शास्त्री, निरंजन शास्त्री, कोठेकर महाराज, दत्तात्रय चोरघे आणि सुनील घनवट उपस्थित होते. या कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदींविषयी विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.