मनमोहक टीका

डॉ. मनमोहन सिंग हे काही पारंपरिक अर्थाने राजकारणी नव्हेत. ते मुळात अर्थशास्त्रज्ञ आणि गांधीवादी. रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते. 1991 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजीव गांधी यांची दरम्यानच्या मतदान टप्प्यात हत्या झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला अल्पमतातील सरकार स्थापन करावे लागले आणि पंतप्रधानपदाची माळ राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून काम केलेल्या पी.व्ही. नरसिंह यांच्या गळ्यात पडली. तो काळ भारताच्या आर्थिक संकटाचा काळ होता. देशाचे सोने गहाण ठेवण्याची पाळी आधीच्या चंद्रशेखर सरकारवर आली होती. त्यावेळी राव यांच्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा, जगाशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपद बहाल करण्यात आले. त्यांनी देशाच्या नव्या धोरणाचा मसुदा तयार करण्यापासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्व केले आणि त्यामुळे ते देशाच्या नव्या आर्थिक सुधारणांचा प्रणेता मानले जातात. त्यामुळेच ते कालांतराने तब्बल दहा वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणूनही कार्यरत राहिले. त्यांच्याबाबत इतके तपशीलवार सांगण्याचे कारण म्हणजे त्यांच्या अर्थमंत्री म्हणून असो अथवा पंतप्रधान म्हणून, त्यांनी बोलण्याऐवजी काम करण्यावर भर दिला. त्यांच्या दुसर्‍या टप्प्यातील पंतप्रधानपदाच्या काळात तर त्यांनी अनेक गोष्टींबाबत तोंड न उघडल्यामुळे त्यांना मौनी म्हणून बदनाम करण्यात आले होते. त्यांचे सरकार जाऊन नरेंद्र मोदी यांचे दुसर्‍यांदा सरकार सत्तेवर आलेले आहे. मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्षे झाली आणि त्यांच्या थापा मारण्याला काही अंत उरला नाही. तसेच मनमोहन सिंग यांनी बदनामी सोसलेल्या काळात देशाने जी अर्थव्यवस्था साधली होती, त्याच्याही खाली आर्थिक प्रगती नेण्याचे काम मोदी यांनी केले आहे. शिवाय, सातत्याने पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देत आपल्या चुका झाकण्याचा उद्योग त्यांनी अजूनही चालू ठेवलेला आहे. आपल्या मौनी स्वभावानुसार मनमोहन सिंग गप्प होते. परंतु त्यांनी पंजाबमध्ये रविवारी झालेल्या मतदानाच्या निमित्ताने आपले मौन सोडून मोदींवर आणि त्यांच्या धोरणांवर थेट जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की मनमोहन, कमकुवत पंतप्रधान, भ्रष्टाचारी असे खोटे आरोप करणार्‍या भाजपा आणि त्यांच्या ‘ब’आणि ‘क’चमूंच्या दुष्प्रचारांचे पितळ लोकांसमोर आता उघडे पडले आहे. लोक आता 2004 ते 2014 या काळातील काँग्रेसप्रणित सरकारच्या लोकोपयोगी कामांची आठवण काढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपाची कानउघडणी केली. ‘मी 10 वर्षे पंतप्रधानपद भूषवले, पण बोलण्यापेक्षा काम करण्याला अधिक प्राधान्य दिले; असे आक्रमक उत्तर सिंग यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे दिले. पंतप्रधान पदाला प्रतिष्ठा असते आणि इतिहासाला दोषी ठरवून तुमचे गुन्हे कमी होत नाहीत, असे ठणकावताना त्यांनी देशातील गंभीर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या काळातील केंद्राच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे लोकांना महागाई आणि बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरही स्वत:च्या चुकांचे खापर पं. नेहरुंवर फोडण्याचा उद्योग सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करताना त्यांनी एकंदर अपयशाचा आढावा घेतला. राजकीय स्वार्थासाठी लोकांना जातीच्या-धर्माच्या नावाखाली, प्रांता-प्रांतात भेद निर्माण करुन फूट पाडली जात आहे, अशी टीका करून ते म्हणाले की लोकांना एकमेकांमध्ये लढवले जात आहे. मोदी सरकारचा राष्ट्रवाद फोडा आणि राज्य करा, या ब्रिटिश नितीवर आधारलेला आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला. लोकशाहीवर मोदी सरकारचा विश्‍वास नसून त्यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत केल्या जात आहेत, अशीही टीका त्यांनी केली. परदेश धोरणातील अपयशाबाबत त्यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता हल्ला केला. लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीन करत असलेली घुसखोरी दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, नेत्यांना बळजबरीने मिठी मारुन, झुल्यांवर झुलवून वा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत. चेहर्‍याला मुलामा लावल्याने मूळ स्वभाव बदलत नाही, तसेच मोठ्या गप्पा मारणे सोपे असते; त्यावर काम करणे कठीण असते, असाही टोला त्यांनी हाणला. मनमोहन सिंग 1014 साली त्यांच्यावर टीका झाल्यावर म्हणाले होते की, ते कमकुवत पंतप्रधान नाहीत आणि माध्यमांपेक्षा इतिहास त्यांचे अधिक दयाळूपणे मूल्यमापन करेल. त्यांचे शब्द खरे ठरत आहेत, असे दिसते.

Exit mobile version