मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लीमीन तथा एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत समावेश करुन घ्यावा, असा प्रस्ताव दिल्यानंतर गेले काही दिवस राज्यातील राजकारणात रंग भरला असून शक्यता आणि प्रतिक्रियांनी उन्हासोबत वातावरणही तापले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीत जलील यांनी, राज्यातील महाविकास आघाडीचे तीन चाकी सरकार आमच्या पाठिंब्याने चार चाकी करावे, अशी औपचारिक मागणी केली. त्यानंतर भाजपाने शिवसेना तसेच राष्ट्रवादीवर टीका केली असून आघाडी सरकारमधील सर्वच घटक पक्षांना त्यावर प्रतिक्रिया देणे भाग पडले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जलील यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे म्हटले असून काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला कोणताच कट्टरवाद मान्य नाही; आम्हाला सर्वधर्मसमभाव हवा आहे, असे सांगून कोणताच कट्टरवाद मान्य होणार नाही, असे सांगत नकार दिला आहे. नाना पटोले यांनी मात्र जलील यांचा नेमका प्रस्ताव काय आहे, हे समजून घेऊन आणि त्यांचे मत काँग्रेस विचारसरणीशी जुळत असेल तर विचार केला जाईल असे म्हटले असून पण तसा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे सांगून विषय बाजूला ठेवला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रस्तावावर भाष्य करताना एमआयएमसोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. सदर प्रस्तावासंदर्भात त्यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला असता पवार यांनी, कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: पक्षच सांगू शकतात. मात्र ज्यांच्यासोबत जायचे आहे, त्या पक्षांनी प्रस्तावाला होकार द्यायला पाहिजे. हा एक राजकीय निर्णय असून तो जर महाराष्ट्रापुरता असल्यास राष्ट्रवादीसाठी अशाप्रकारच्या राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला नाही. पक्षाची राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका घेता येणार नाही आणि महाराष्ट्रातही तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगून त्यांनी विषयाला पूर्णविराम दिला तरी काही गोष्टी जनतेत चर्चेस खुल्या सोडल्या आहेत. या विषयात शिवसेनेचे मत महत्त्वाचे आणि निर्णायक होते, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा विषय म्हणजे हा भाजपचाच कट आहे असे सांगून औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणार्या ‘एमआयएम’शी युती कदापि शक्य नाही, असे त्यांनी जाहीर केले आणि विषयाला पूर्णविराम दिला. यासंदर्भात सविस्तर बोलताना ठाकरे यांनी भाजपावर शिवसेनेला जनाबसेना म्हटले जात असून आपण हिंदुत्व सोडलेले आहे, असे दाखवण्याचा डाव आहे, असा आरोप केला आहे. काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएमने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा, हाच खरा डाव आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणार्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही, हे माहीत असतानाही उगाच हा मुद्दा काढून शिवसेना हिंदुत्वापासून दूर चालली आहे हे दाखवायचा खरा डाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची आपल्याला शंभर टक्के खात्री असून त्यातून एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे, असे सांगत, शिवसेनेला बदनाम आणि नामशेष करण्याची ही चाल आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला. अलिकडच्या काळात झालेला ओवेसींच्या एमआयएम पक्षाचा उदय झाला आणि तेव्हापासूनच भाजपानेच त्यांना हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणासाठी उभे केले असल्याची चर्चा होती. ती अजूनही लयास गेलेली नाही. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतही एमआयएमने 95 उमेदवार रिंगणात उतरविले परंतु एकही उमेदवार निवडून आला नाही. पण त्यांनी विरोधकांची मतविभागणी घडवून आणल्यामुळे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला फटका बसला अशी राजकीय विश्लेषणे केली गेली. तसा फटका शिवसेना तसेच महाविकास आघाडीला एमआयएमच्या आगमनाने बसू शकतो. उदा. औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा मुख्य प्रचार मुद्दा हिंदुत्व असल्याने त्यांच्यासाठी अडचण निर्माण होईल आणि विरोधकांचा डाव साधला जाईल. त्यामुळे एमआयएम हा आघाडी सरकारच्या कबुतरांच्या पिंजर्यात सोडलेला भाजपचा बोका आहे, हे लक्षात ठेवूनच त्याला योग्य प्रत्युत्तर देण्यात आले आहे.