कवी अंतर्मुख असतो, त्याचे जगणे या जगातील असूनही त्याचे स्वत:चे एक वेगळे या जगापासून फारकत घेतलेले एक जग असते असे साधारणत: समजले जाते. कवी सतीश काळसेकर त्यातील अपवादात मोडतात. त्यांचे जगणे या जगाला सोबत घेऊन जसे होते तसे ते आपल्या आतील जगालाही तेवढेच सांभाळण्याचेही होते. कारण या दोन्हींमध्ये त्यांच्या लेखी काहीही फरक नव्हता, या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी एकच होत्या. सतीश काळसेकर यांचा लोकसंग्रह इतका विलक्षण होता की, त्यांना जगन्मित्र म्हटले जाई. महाराष्ट्राच्या कानाकोपर्याला आपला करत त्यांचे कविता वाचत चाले, कविता ऐकणे चाले. म्हणून त्यांची स्वत:ची जितकी पुस्तके आली नसतील त्याच्या कैकपटीने अधिक पुस्तके त्यांनी इतरांची जन्माला घालण्यास मदत केली. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अनेक नवोदित कवींना प्रकाशात आणले, अनेक लेखकांची पुस्तके वाचकांपर्यंत पोचवली. वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी जन्मलेल्या काळसेकर यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याच्या निमित्ताने मुंबईत येणे केले. त्यानंतर काही मासिकात आणि टाइम्समध्ये नोकरी केली. मात्र विद्यार्थी दशेपासूनच कविता करणार्या काळसेकरांना मुंबईत व्यापक परीघ लाभला आणि ते साहित्य निर्मिती करत साहित्याच्या तेव्हाच्या अभूतपूर्व चळवळीतही सामील झाले. ते 1960 च्या दशकात मराठीत उदयास आलेल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीतील महत्वाचे व्यक्तित्त्व बनले. साहित्यापासून ते चौकटयुक्त जगण्यापर्यंतचे प्रस्थापितांचे मानदंड नाकारणार्या या चळवळीत ते नारायण सुर्वे, अरुण कोल्हटकर, शहाणे, पाध्ये आणि भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत अनेकांच्या सोबतीने तीव्रतेने सहभागी झाले. त्यांची प्रतिक्रियावादी आणि बंडखोरीची भूमिका असली तरी त्यांची जगण्यावरची आणि मुख्य म्हणजे माणसांप्रतीची आसक्ती आणि श्रद्धा इतकी निस्सीम होती की तेव्हाही आणि शेवटपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या कटुतेला शिरकाव करता आला नाही. याचे कारण त्यांच्या कायम माणसांशी जोडले राहण्याच्या त्यांच्या स्वभावात असावे. किंवा आयुष्यभर त्यांना तरुणांइतक्या उत्साहाने कार्यरत ठेवणार्या प्रेरणेत असावे. वयाला साजेसे प्रेम केले उन्मादक उसळत्या लाटांतून वयाला साजेसा वागलो उन्मत्तासारखा दिवस-रात्रीतून
या त्यांच्या ओळी या संदर्भात बोलक्या आहेत. आपल्या कवितेबद्दलच्या लेखात त्यांनी ही भूमिका खूप स्पष्टपणे मांडली. ‘माझ्या एकूणच जगण्याची व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक आयुष्य अशी विभागणी करणे मला योग्य वाटत नाही; हे दोन्हीही परस्परांत मिसळलेले आहेत. या संयोगातूनच माझी कविता लिहिली गेली आहे. हा सगळा काळ वर्तमानकाळच आहे. त्यामुळे ही कविता या काळाचीच निर्मिती आहे.’ 1971 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला आणि कवी सतीश काळसेकर याला अवघे मराठी साहित्य विश्व ओळखायला लागले. मूळ पिंड कवीचा असला तरी त्यासोबत अनुवादासह अन्य गद्य वाङ्मयीन प्रकारही त्यांनी हाताळले. त्यांना त्यासाठी साहित्य अकादमी, सोव्हिएत लँड पुरस्कार आदी मानसन्मान लाभले. परंतु या पुरस्कारांची झुल त्यांच्यावर चढून ते प्रस्थापित झाले नाहीत. ते सामाजिक जीवनात भेटेल त्याचे कल्याण करणारे कार्यकर्ते होते आणि साहित्यासाठी तितकीच तळमळ आणि अस्वस्थता बाळगून असलेले तरुण होते. त्यांनी आयुष्यात माणसे कमावली आणि पुस्तकांची संपत्ती जपली. पेण येथील लेखक कलावंतांसाठीच्या आवासात पुस्तके आणि साहित्यनिर्मितीसाठी त्यांनी जागा निर्माण केली. पुस्तकांविषयी ही त्यांची पोस्टर कविता अनेकांच्या भिंतीवर अजून असेल. ‘मी कविता का लिहितो कारण मला कविता लिहिल्याशिवाय राहवत नाही, अशी होणारी मनस्थिती हे आहे. पण पुढचा प्रश्न मी स्वत:लाच विचारत असतो तो असा की, कविता लिहिल्याशिवाय राहवत नाही ते का? हा पुढचा प्रश्न अधिक छळणारा आहे. काहीतरी सांगण्यासाठी मी अस्वस्थ असतो’ या अस्वस्थतेला धरून अर्थपूर्ण जगू पाहणारा हा कवी पुस्तकांच्या संपत्तीबाबत तितकाच हळवा आणि वाहिलेला आहे, हे ती पोस्टर कविता वाचून कळते. त्यातील शेवटची ओळ, तरीही पुस्तके भाकरीसाठी विकता येत नाहीत, जितकी पुस्तकांबद्दल आहे तितकीच ती त्यांच्याबद्दलही. कविता, साहित्याच्या मार्गावरील हा तरुण, लाघवी आणि बंडखोर प्रवासी आपल्या पाउलखुणा मागे ठेवून आपला अचानकपणे निरोप घेऊन निघाला आहे. बरेच देऊन, काही आपल्यावर सोडून आयुष्यभर फेडत राहिलो अधल्यामधल्या उसनवार्या चिल्लर आणि मुळांतून जे द्यायलाच हवे होते ते तसेच राहून गेले पाठीवर त्यांना विनम्र आदरांजली.