महाराष्ट्रातील पर्यटन म्हटले की काही चांगले आणि बरेच काही न सांगण्यासारखे असे चित्र आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या खूप मोठ्या संधी आहेत आणि राज्याच्या विविधतेनुसार विकास झाल्यास त्याचा फार मोठा फायदा स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती, परिसराचा विकास आणि राज्याची महसूलवाढ या सगळ्या पद्धतीने होऊ शकतो. त्यादृष्टीने वेगवेगळ्या वेळी विविध योजना जाहीर होतात. परंतु एकंदर परिस्थिती पाहता फार आशादायक चित्र आहे, असे म्हणता येत नाही. आता राज्य सरकार काही पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी भागिदारी तत्त्वाचा वापर करणार असल्याचे जाहीर केले आहे. बनवा, वापरा, हस्तांतरीत करा (पीपीपी) याबरोबरच संयुक्त विद्यमाने, स्वतंत्रपणे व भागीदाराने आदी तत्त्वावर पर्यटन परिसराचा विकास करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्याद्वारे येणार्या पर्यटकांसाठी पंचतारांकित सुविधा देण्याचा घाट घातला आहे. महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांद्वारे राज्यातील काही निवडक पर्यटनस्थळांचा जागतिक मानकांनुसार, म्हणजेच पंचतारांकित पातळीवर विकास साधला जाईल. यात हॉटेल व्यावसायिकांबरोबरची भागिदारी हे त्याचे ठळक वैशिष्ट्य असणार असून, अम्युझमेंट पार्क, साहसी क्रीडा, वॉटर पार्क आदी उभारले जातील. अर्थात, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याने पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची लोककला, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोगररांगा या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणावर विकसित होणार असल्याचेही सरकारने जाहीर केले आहे. काही महिन्यांपूर्वी याच सरकारने कॅराव्हॅनसारख्या योजनांना परवानगी देण्याचे आणि त्यांच्यासाठी निश्चित स्थानके निर्माण करण्याचे जाहीर केले होते. त्याचे पुढे काय झाले, ते कळले नाही. परंतु, आता या पंचतारांकित सुविधा निर्माण करण्याचे निश्चित झाले आहे आणि त्यानुसार पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर कोणत्या ठिकाणी विकास साधला जाईल, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये रायगड आणि कोकणमधील काही ठळक ठिकाणांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातच माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, मिठबाव येथे पर्यटकांसाठी पंचतारांकित सुविधा निर्माण केल्या जातील. यासंदर्भात दोन गोष्टी विशेषत्वाने सांगायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे, ही सगळीच स्थळे काही परदेशी पर्यटकांनी गजबजलेली नसतात. अजंठा, एलोरा याठिकाणी परदेशी पर्यटक ज्या प्रमाणात येतात, तसे कोकण आणि रायगडमध्ये येत नाहीत. मात्र, खूप मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय लोक मात्र आवर्जून येतात. त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने त्यांचा तेथे मुक्काम फार काळ राहात नाही. काही वेळा या ठिकाणी येऊन राहायचे कुठे आणि करायचे काय, असा प्रश्न पडतो. त्यादृष्टीने या मध्यमवर्गाला ध्यानात ठेवून या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा ठरवल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. कारण हा वर्ग पंचतारांकित सुविधांसाठी आसुसलेला नाही आणि त्याला ते उपलब्ध केले तर परवडणारही नाही. त्यांची अपेक्षा असते ती म्हणजे स्वच्छ, नीट कुटुंबाला रात्रीचा मुक्काम करता येईल अशी निवासाची व्यवस्था, जवळपासच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी चांगले रस्ते, वाहन, सामानासाठी सुरक्षित जागा, खाण्यापिण्याच्या सुविधा आणि सर्वांत महत्त्वाचे स्वच्छ स्वच्छतागृहे. विशेषतः महिलावर्गाला या दृष्टीने खूप मनस्ताप सहन करावा लागतो. कारण, या पट्ट्यात स्वच्छतागृहांची खूप वानवा आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे, या विकासातून या परिसरावर निसर्गाचा प्रकोप होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार. कारण, सध्या या पट्ट्यामध्ये ज्या प्रमाणात निसर्ग कोपला आणि काही वर्षांपासून तज्ज्ञ जो इशारा देत आहेत तो लक्षात घेतला, तर या संवेदनशील पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करणे धोक्याचे ठरू शकते. तसे करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि निसर्गाचा कल लक्षात घेऊन, ओढे, नद्या यांचे प्रवाह सुरक्षित ठेवून हा विकास साधावा लागेल. सगळीकडे सिमेंट काँक्रिटचे अच्छादन निर्माण करणे, आणि कोणत्याही पद्धतीने डोंगर कापून रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही. ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत तेवढ्या लक्षात घेऊन, आणि विशेषत: भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या मध्यमवर्गाला नजरेपुढे ठेवून हे केले, त्याच्या जोडीला स्थानिकांना त्यात विविध पद्धतीने सामावून घेऊन त्यांच्या रोजगार आणि व्यावसायिक आकांक्षांना प्रोत्साहन दिले आणि परिसराचा आदर राखून विकास केला तर तो या भागासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो.