बळवंत वालेकर
सत्काराला उत्तर देताना वैद्य साहेब म्हणाले आज माझ्या शाळेने केलेला माझा सत्कार आणि जुन्या मित्रांचा सहवास पाहून मी पूर्णतः भारावून गेलो आहे. या शाळेतील गुरुजनांनी मला जे जे धडे शिकविले, जी शिस्त अंगी बाणविली त्यामुळेच माझा भावी काळ उज्ज्वल ठरला. येथे शिकलेल्या कारपेंटरी व वीव्हिंगकलेमुळे मला वेगळी दिशा मिळाली. म्हणून मी भारताचा भू दल सेनाप्रमुख होऊ शकलो.
पंजाब प्रांतात अतिरेक्यांनी धुडगूस घालून खलिस्तानची मागणी केली. सर्वत्र अशांतता माजली. सामान्य माणसाला जगणे असह्य झाले. कायदा व सुव्यवस्था ढासळू लागली. भारताचे अखंडत्व धोक्यात आले. प्रांताप्रांतांमधील फुटीरता नष्ट होण्यासाठी व भारताचे अखंडत्व टिकविण्यासाठी आणि सामान्य माणसाला दिलासा मिळण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भू सेना प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांना अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे आदेश दिले. सरसेनापती वैद्यजींनी मोठ्या कौशल्याने व निर्भीडपणे आदेशाचे पालन करून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. परिणामी अतिरेक्यांची चळवळ थंडावली. भारताच्या फुटीरतेचे संकट टळल्यामुळे पंतप्रधान इंदिराजींसह लष्करप्रमुख वैद्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले गेले. पण पंतप्रधान इंदिराजी व लष्कर प्रमुख वैद्य अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले. वैद्य भू दल सेनाप्रमुखपदावर असेपर्यंत त्यांना शासकीय संरक्षण (सिक्युरिटी) होती. पण ते नियत वयोमानानुसार निवृत्त होताच शासकीय संरक्षण काढले गेले. आणि अतिरेक्यांनी डाव साधला. वैद्य सेवा निवृत्तीनंतर आयुष्याची सायंकाळ समाधानाने घालविण्यासाठी पुणे येथे स्वतःच्या वास्तूत राहावयास गेले व खलिस्तानवाद्यांनी डाव साधला. संपूर्ण सावधगिरीने त्यांच्यावर दि. 10 ऑगस्ट 1986 रोजी हल्ला केला. त्यात लष्कर प्रमुख वैद्य शहीद झाले. संपूर्ण भारत दुःख सागरात बुडाला. अलिबागचे सुपुत्र असलेल्या वैद्य साहेबांची आज दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी 36 वी पुण्यतिथी आहे. वैद्य कुटुंब मूळ अलिबागचे. अरुणकुमारांचे पिताश्री श्री धरपंत. शालीन, सच्छील व उच्चविद्याविभूषित असलेले श्रीधरपंत जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. अलिबाग येथेही ते जिल्हाधिकारी होते. स्वतःच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करणे कठीण असते. पण त्यांच्या शालीन स्वभावामुळे ते येथेही यशस्वी ठरले. सनदी अधिकार्यांच्या बदल्या सतत होत असतात. म्हणून बिर्हाडही हलवावे लागल्यामुळे अरुणकुमारांचे शिक्षण विविध ठिकाणी झाले. प्रखर बुद्धी, अचूक निर्णयक्षमता असलेल्या अरुणकुमारने पिताश्रींप्रमाणे ख. उ. ड. होऊन सनदी अधिकारी होऊन सुखी समाधानाने जीवन जगावे अशी आई वडिलांची इच्छा होती. पण अरुणकुमारांचे ध्येय वेगळेच होते मळलेल्या वाटेने जाऊन कोणीही यशस्वी होतो. त्यात मर्दुमकी नसते, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन शिखर गाठण्यात मर्दुमकी असते. यासाठी रणरणते ऊन, कडक थंडी, वितळते बर्फ आणि मुसळधार पाऊस सहन करीत तसेच माणसाच्या शत्रूशी सामना करीत यशस्विता गाठण्यासाठी ते लष्करात दाखल झाले. कडक शिस्त, प्रसंगावधान, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा उरक, विश्वासार्हता, मनोधैर्य, चिकाटी व ध्येयाचा ध्यास यामुळे ते विविध पदकांचे मानकरी ठरले. त्यात महावीर चक्र, अतिविशिष्ट सेवा पदक, दुसरे महावीर चक्र इ. चा समावेश आहे. तसेच कमांडंट सदर्न, कमांडंट चीफ ऑफ दी स्टाफ, आर्मी कमांडंट या बढत्या मिळाल्यानंतर भू दल सेना प्रमुख (चीफ ऑफ द आर्मी) पदी दि. 1 ऑगस्ट 1983 रोजी नियुक्ती झाली. हा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा, सरखेल कान्होजींच्या कुलाबा जिल्ह्याचा व अलिबागच्या वैद्य घराण्याचा सन्मान आहे.
अलिबाग या मातृभूमीस भेट
भूदल सेनाप्रमुख हे लष्करामधील सर्वोच्च पद भूषवित असल्यामुळे वैद्य साहेबांची जबाबदारी वाढली होती. पंजाब प्रांताचे अखंडत्व जपण्यासाठी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार केले व यशस्वीही झाले. पण त्यांना वेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. निनावी फोनमुळे त्यांची भयग्रस्तता वाढली होती. त्याच काळात अलिबाग या मातृभूमीची तसेच ज्या शाळेत शिकलो त्या टोपीवाला इंडस्ट्रियल हायस्कूलची आणि शिक्षकांची सारखी आठवण येत होती. अलिबाग शहराला भेट देण्यासाठी व नातेवाईकांना पाहण्यासाठी ते आतूर झाले होते. वस्तुतः इंडस्ट्रियल हायस्कूलचा माजी विद्यार्थी भारताचा भूदल सेना प्रमुख झाल्यामुळे इंडस्ट्रियल हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अरुणकुमार वैद्य यांना निमंत्रित करून सत्कार करावयास हवा होता. पण…? शेवटी भारताच्या भूदल सेना प्रमुखांच्या कार्यालयाचे पत्र इंडस्ट्रियल हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना आले, त्यानुसार भूदल सेना प्रमुख अरुणकुमार वैद्य यांनी दि. 29/8/1985 रोजी शाळेस भेट दिली. ही कृतज्ञतापूर्वक भेट फक्त 15 मिनिटांची होती. अन्य लष्करी अधिकारी, त्यांच्या पिंगट हिरव्या रंगाच्या गाड्यांचा ताफा, अन्य लवाजमा व त्यांची लष्करी शिस्त वेगळीच होती. प्रारंभी संस्थेचे कार्याध्यक्ष आ. दत्ता पाटील यांनी भारताच्या भूदल प्रमुखपदी विराजमान झालेल्या माजी विद्यार्थ्याचा (अरुणकुमार वैद्यांचा) छोटेखानी सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना वैद्य साहेब म्हणाले आज माझ्या शाळेने केलेला माझा सत्कार आणि जुन्या मित्रांचा सहवास पाहून मी पूर्णतः भारावून गेलो आहे. या शाळेतील गुरुजनांनी मला जे जे धडे शिकविले, जी शिस्त अंगी बाणविली त्यामुळेच माझा भावी काळ उज्ज्वल ठरला. येथे शिकलेल्या कारपेंटरी व वीव्हिंगकलेमुळे मला वेगळी दिशा मिळाली. म्हणून मी भारताचा भू दल सेनाप्रमुख होऊ शकलो. राणे गुरुजींनी मला जे धडे शिकविले, जी शिस्त अंगी बाणविली त्यामुळे मी माझे ध्येय गाठू शकलो. राणे गुरुजींचा उल्लेख करताना सेना प्रमुखांचा कंठ दाटून आला. व भारावलेल्या अरुणकुमारांनी चांदीच्या तलवारीचे प्रतिक व 5000 रूपये मूल्याचा धनादेश ही गुरुदक्षिणा शाळेला दिली.
इंडस्ट्रियल हायस्कूलचे नामांतर
भारत देश अखंड राहण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार केल्यामुळे अतिरेक्यांच्या हिटलिस्टमध्ये अरुणकुमार गेले व ते शहीद झाले. ते भारताचे सरसेनापती असताना आपल्या हायस्कूलला कृतज्ञतापूर्वक भेट त्यांनी दिलेली होती अशाप्रकारे वीरमरण आलेले ते एकमेव भूदल प्रमुख होते. जनरल अरुणकुमारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी इंडस्ट्रियल हायस्कूलला जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव द्यावे अशी चर्चा अलिबाग शहरात सुरू होती. पण त्याबाबत कार्यवाही होण्यासाठी संस्थेच्या प्रमुखांना भेटणे गरजेचे होते. पण तसे धैर्य कोणीही करीत नव्हते. सदर लेखक त्यावेळी इंडस्ट्रियल हायस्कूलमध्ये सहशिक्षक होते. शिवाय त्या हायस्कूलच्या शाळा समितीचे सदस्य व को.ए.सो.च्या विकास नियतकालिकाचे संपादक होते. त्यांनी या विषयाबाबत इंडस्ट्रियल हायस्कूलचे मुख्याध्यापक श. वि. पटवर्धन यांच्यासमवेत चर्चा केली. नामांतर करण्यासाठी संस्थेची परवानगी हवी असे ते म्हणाले. पण श्रेष्ठींकडे लेखकासोबत येण्यास त्यांनी असमर्थ ता दर्शविली.
त्याकाळात को. ए. सो. चे पदाधिकारी सायंकाळी रायगड बाजारमध्ये अध्यक्षांच्या दालनात बसत असत. एका सायंकाळी सदर लेखक रायगड बाजार येथील दालनात गेले. भेट घेण्याचा विषय लेखकाने स्पष्ट केल्यानंतर इंडस्ट्रियल हायस्कूलच्या नामांतराचा विषय रायगड बाजारचे तत्कालीन जन. मॅनेजर प्रतापराव सरनाईक यांना विशेष भावला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील यांनीही या सूचनेला संमती दिली. त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. दत्ता पाटील म्हणाले शाळेच्या नामांतरासाठी शाळा समितीचा ठराव संस्थेकडे पाठविण्यास मुख्याध्यापकाना सांगा. शेवटी इंडस्ट्रियल हायस्कूलच्या शाळा समितीने नामांतराबाबत प्रस्ताव संस्थेकडे पाठविल्यानंतर त्याबाबत सर्व सोपस्कार पूर्ण होताच को.ए.सो. जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय अलिबाग असे नामांतर केले गेले या नामांतराचे सर्व क्षेत्रात स्वागत झाले.
भारताचे अखंडत्व टिकावे
हीच श्रद्धांजली.
रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक जवान पारतंत्र्य काळापासून लष्करात मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात. काही शहीद होतात. पण त्यापैकी कोणीही उच्चस्तरीय अधिकारी झालेला नाही. भूदलसेनाप्रमुख नाहीच नाही. ही खेदाची बाब आहे. या जिल्ह्यातील जवानांना सैनिक शाळेत अग्रहक्काने प्रवेश मिळावा, त्यांना अधिकारी पदापर्यंत बढती मिळावी. तसेच जनरल अरुणकुमार वैद्यांप्रमाणे भूदल सेनाप्रमुखपद भूषवावे, या हेतूने स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पुरोहित यांनी आचळोली (महाड) येथे सैनिक शाळा सुरु केली. पै पैसा गोळा केला. पण नानासाहेबांच्या पश्चात पांढरे उंदीर या संस्थेत घुसले. आणि शाळा नाइलाजाने बंद करावी लागली. रायगड जिल्ह्यात अधिकाधिक लष्करी अधिकारी व्हावेत तसेच भारताचे अखंडत्व चिरकाल टिकावे, हीच वैद्य साहेबांना श्रद्धांजली ठरेल.