अतुल गुळवणी
रायगड जिल्ह्याच्या राजकारणातील एक उमदे व्यक्तिमत्त्व, महाडचे माजी आमदार, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप तथा आबा यांचे झालेले आकस्मिक निधन ही समस्त रायगडवासियांना चटका लावून जाणारी घटना म्हटली पाहिजे. हसतमुख, आश्वासक चेहरा, आक्रमकपणा, अमोघ वक्तृत्व, संघटित नेतृत्व आणि सर्वसामान्यांविषयी असणारी आस्था ही माणिकरावांची गुणवैशिष्ट्येे.त्यांची खरी ओळख आबा अशीच होती. घरगुती परिवारातील हे नाव राजकारणातही चांगले लोकप्रिय झाले होते. कुठल्याही कठीण प्रसंगात झोकून देण्याच्या वृत्तीमुळे आबा सर्वांनाच आपलेसे वाटत राहिले. महाडच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात आबा नेहमीच अग्रेसर राहिले. त्यामुळे महाडकरांवर ज्या ज्यावेळी संकटे आली तेव्हा तेव्हा आबा अर्थात माणिकराव जगताप आधी धावून गेल्याचे सर्वच प्रसंगात दिसून आले.
माणिकराव जगताप यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली ती रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. 1992 मध्ये ते महाड तालुक्यातून जिल्हा परिषदेवर काँग्रेसतर्फे निवडून आले. काँग्रेसच्या विचारांचे पाईक असलेल्या माणिकरावांनी आपल्या कर्तृत्वाने रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात आपले स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले.जिल्हा परिषदेत त्यावेळी शेकापची सत्ता जाऊन सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची सत्ता निर्माण झाली होती. त्यावेळी सत्ताधारी काँग्रेस आणि प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शेकाप यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी होत असे.त्या जुगलबंदीतही माणिकरावांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यांच्या याच स्वभावामुळे शेकापचे ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांची माणिकराव जगताप यांच्यावर विशेष मर्जी जडली. प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील यांचे राजकारणाच्या पलिकडे संबंध जोडण्याच्या स्वभावामुळे माणिकराव जगताप आणि पाटील कुटुंबियांचे स्नेहाचे संबंध वृद्धींगत झाले ते आजही कायमचे टिकून आहे. पुढे सन 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील तटकरे, तत्कालीन विरोधी पक्षनेत्या मीनाक्षी पाटील, पनवेलचे विवेक पाटील ही मंडळी विधानसभेवर निवडूण गेली. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर काँग्रेसने पनवेलच्या अनंत पाटील यांची निवड केली. याच अनंत पाटील यांच्यावर शेकापने अविश्वास ठराव आणून काँग्रेसच्या रमेश डाऊर यांना अध्यक्ष केले. पुढे 1997 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शेकापने पुन्हा सत्ता हस्तगत केली. त्यावेळी काँग्रेसचे विठ्ठलराव लोहकरे अध्यक्ष तर शेकापचे नारायण ठाकूर उपाध्यक्ष झाले. त्यावेळी जि.प.अध्यक्षपद हे एक वर्षासाठी होते. त्यामुळे त्यानंतर 1998 मध्ये काँग्रेसने शेकापसमवेतची युती तोडून शिवसेनेशी युती केली. त्यातून मग श्रीवर्धनचे अब्दुल सत्तार अंतुले हे अध्यक्ष झाले. सन 1999 मध्ये शेकापने काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून सत्ता हस्तगत केली.त्यावेळी शेकापच्या सुप्रिया पाटील या अध्यक्षा तर फुटीर काँग्रेसतर्फे माणिकराव जगताप हे उपाध्यक्ष झाले. सुप्रिया पाटील, माणिकराव जगताप यांना तीन वर्षाचा कार्यकाल मिळाला होता. या काळात उभयतांनी रायगडच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.
पुढे राज्यातील राजकारण बदलले 1999 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी रायगडातून ज्या नेत्यांनी पवारांना प्रतिसाद दिला त्यात माणिकराव जगताप हे आघाडीवर होते. ज्येष्ठ नेेते दत्ताजीराव खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली माणिकराव जगताप, वसंतराव ओसवाल, आप्पासाहेब धारकर आदी मंडळींनी रायगडात राष्ट्रवादीची बीजे रोवली. 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली.पण शिवसेनेच्या प्रभाकर मोरेंकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाचा बदला 2001 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव जगताप यांनी घेतला आणि विधानसभेवर राष्ट्रवादीचे आमदार म्हणून विजयी झाले. एक जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून आबांनी विधानसभेत आपली प्रतिमा उमटवली. महाडबरोबरच रायगडच्या मुलभूत प्रश्नांसाठीही ते आक्रमक राहिले. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे यांचे प्राबल्य वाढल्याने माणिकराव जगतापांसारखी पक्ष स्थापनेत पुढाकार घेणारी मंडळी मागे पडत गेली.त्यामुळे माणिकराव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन रायगडात काँग्रेसला पुन्हा चेतना देण्याचे काम केले. या काळात त्यांची प्रदेश कार्यकारिणीसह अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही काम करण्याची संधी आबांना मिळाली. जिथे जिथे काम करण्याची संधी प्राप्त झाली त्या ठिकाणी महाडच्या या सुपूत्राने आपली छाप निश्चित पाडली हे कुणीही नाकारु शकत नाही.
महाडला आतापर्यंत अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. विशेष करुन पावसाळ्यात दरवर्षी महाडमध्ये कोणतीतरी मोठी दुर्घटना घडतेच. अशावेळी माणिकराव नेहमीच पुढे राहिले. सन 2005 मध्ये आलेला महापूर असो वा त्याचवेळी झालेली दरड कोसळण्याची दुर्घटना. त्यावेळी त्यांनी आपदग्रस्तांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे काम प्रामाणिकपणे केले. सावित्री नदीवरील कोसळलेल्या पूल दुर्घटनेतही माणिकराव हे मदतकार्यात पुढे होते. गतवर्षी महाडला तारिक गार्डन इमारत दुर्घटना घडली. त्यावेळी मदतकार्यासह आपदग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा माणिकराव अग्रणी होते. राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. महाड हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याने महाडच्या जनतेविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यामुळे ज्या ज्यावेळी संकटे आली तेव्हा माणिकराव जगताप नेहमीच अग्रणी राहिले. महाड नगरपालिकेवरही माणिकराव जगताप यांनी एकहाती सत्ता हस्तगत केली. स्नेहल जगताप या आपल्या कन्येलाच महाडच्या नगराध्यक्षपदी विराजमान करुन आपला राजकीय वारसदारही त्यांनी जाहीर केला होता. माणिकरावांच्या नेतृत्वाखाली स्नेहल जगताप यांनीही महाडला मुलभूत सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न केले. महाड हे नेहमीच संवेदनशील शहर म्हणून रायगडात ओळखले जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या महाडला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही चरण लागलेले असल्याने येथील वातावरण नेहमीच जागरुक आणि संवेदनशील राहिलेले आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना राज्यात घडली तर त्याचे पडसाद नेहमीच महाडच्या भूमीत उमटत असतात. असे अनेक प्रसंग महाडमध्ये आतापर्यंत घडलेले आहेत अशावेळी संयम राखत सलोखा राखण्याचे काम माणिकराव जगताप यांच्यासारख्या नेतेमंडळींनी केले हे कुणीही विसरु शकत नाही.
सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीतही माणिकराव जगताप यांनी विशेष पुढाकार घेतला होता. कोरोना रुग्णांसाठी लोकमंगलम या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यातून पत्रकार संघाच्या सहकार्यातून मोफत कोरोना सेंटर सुरु केले होते. दुर्दैवाने याच कोरोनाची लागण माणिकरावांनाही झाली.त्यातून ते बरेही झाले. त्यांच्यावर मुंबईत उपचारही सुरु होते. पण दुर्दैवाने या उमद्या नेत्याचा असा अकाली मृत्यू झाला आणि एक आबांचा डाव अर्ध्यावरच मोडून पडला. त्यांच्या जाण्याने रायगडात काँग्रेसची अपरिमित अशी हानी झाली आहे. गेल्याच आठवड्यात अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनाही देवाज्ञा झाली. त्या दु:खातून काँग्रेसजन बुडाले असतानाच माणिकरावांच्या निधनाचा धक्का हा सर्वांनाच वेदना देणारा आहे हे कुणीही नाकारु शकत नाहीत.
पत्रकांराचा राजकीय सोर्स लुप्त
अलिबाग हे रायगडचे मुख्यालय असल्याने माणिकराव जगताप यांचे अलिबागला सातत्याने येणे होत असे. उमद्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी अलिबागच्या पत्रकारांना नेहमीच आपुलकी वाटत असे. आबाही अलिबागला आले की हमखास फोन करुन अतुल, सुभाष, जयंता मी आलोय, या चहाला असे आवर्जून आमंत्रण देत असतं.त्यांच्याशी गप्पा मारताना अनेक विषयही चर्चिले जात त्यातून आबा एखादा क्ल्यू देऊन जायचे.एका अर्थाने ते आम्हा पत्रकारांसाठी राजकीय सोर्स सारखेच होते. त्यामुळे आबांचे असे जाणे आम्हा पत्रकारांनाही चटका लावून जाणारे असेच आहे.