स्वाती पेशवे
गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभदिन. महाराष्ट्रात या सणाचा प्रचंड उत्साह दिसतो आणि नव्या-जुन्याचा संगम झाल्यासारखे भासते. जुन्या पिढीबरोबरच सळसळती तरुणाईदेखील पारंपरिक पोषाख परिधान करुन देवदर्शन घेते, मुली-महिला पारंपरिक वस्त्रालंकार धारण करुन शोभायात्रेमध्ये सहभागी होतात, घरांसमोर रांगोळ्या सजतात तेव्हा खरोखर नवचैतन्यांची पावले उमटल्याचा भास होतो. उभारलेली गुढी त्याचे स्वागत करते.
कोणताही आरंभ अत्यंत आश्वासक असतो, आशादायी असतो. गुढीपाडव्याचा दिवस त्याला अपवाद नाही. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या उत्साहात हा वर्षारंभ साजरा करण्याची प्रथा दिसते. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी रांगोळ्या काढून, देखावे उभारुन, शोभायात्रा काढून आनंदोत्सव साजरा केला जातो. लहान-थोर एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि सकारात्मक पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करतात. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असे म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेला कळक जमिनीत रोवला आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी या दिवशी गुढीचे पूजन केले जाऊ लागले. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असल्याचा उल्लेख वेदांमध्ये आढळतो. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून अयोध्येला या दिवशी परत आले. त्यामुळे हा दिवस गुढ्या-तोरणे उभारुन साजरा केला गेला. तोच रिवाज आजही पाळला जातो. या सणामागे अशा अनेक कथांच्या साखरगाठ्यांची गुंफण दिसते. म्हणूनच त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते.
आजच्या आधुनिक युगातही या सणाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या असणारी महती कमी झालेली नाही. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूचे आगमन होते. त्यामुळे वातावरणही बदलते. सुकलेली पाने गळून झाडांवर नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो. सगळ्याच झाडांवर, वृक्षांवर सतेज पर्णभार डवरु लागतो. कोकिळेचे कूजन सुरू होते. या सकारात्मकतेचे स्वागत करणे आणि येऊ घातलेल्या संपन्नतेला सामोरे जाणे हादेखील दारी गुढ्या-तोरणे उभारण्यामागचा एक उद्देश असावा. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीला कडूलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे घटक कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाण्याची प्रथा दिसते. यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्ताचा नाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड नष्ट करणे हे सर्व साध्य होते. कडुनिंबामध्ये आरोग्यरक्षक गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदातही याला अत्यंत महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून त्याने स्नान केले जाते.
या दिवशी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच काठी धुवून स्वच्छ केली जाते. तिला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून सजवले जाते. गुढी घराच्या दारात अथवा खिडकीत उभारण्यात येते. हा शृंगारलेला कळक म्हणजे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात. महिला खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोतर, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात. घराप्रमाणेच सार्वजनिक पातळीवरही हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर चौकाचौकात मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. लेझीम, ढोल, ताशे वाजवत भव्य-दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि नवीन मराठी वर्षाचे स्वागत करतात. या दिवशी भल्या पहाटे देवदर्शनाला जाऊन, साखरमाळ अर्पण करून ग्रामदेवता आणि इष्ट देवतेचे आशीर्वाद घेतले जातात. घरोघरी सुग्रास नैवेद्य, स्वयंपाक रांधला जातो. देवाला मनोभावे नैवेद्य अर्पण करून नंतर तो ग्रहण करतात. एकंदरच उत्साह आणि अध्यात्म, चैतन्य आणि प्रेरणा, विचार आणि विवेक यांचा ताळमेळ राखत नवतेजाला समर्पित होण्याचा रिवाज म्हणजे गुढीपाडवा!
हा काळ ऋतूबदलाचा असतो. या काळात हवेतला गारवा कमी होऊन उष्ण झळा वातावरणातील ऊब वाढवतात. चैत्राच्या आगमनाची चाहुल लागताच सृष्टीचा मांडव सजू लागतो. कुठे गुलमोहराचा रक्तिमा तर पळसाच्या देखण्या ज्वाळा, कुठे बहाव्याचा कांचनरंग तर कुठे वाटेवर सडा घालणारा एप्रिलच्या फुलांचा बहर. मोगरा अंगोअंगी शहारतो. चाफा, जास्वंद, गुलाब, केवडा डवरतोय. या सर्वांचा एकत्रित सुगंध वातावरणात दरवळतो. त्यात सकाळ, संध्याकाळची स्निग्ध हवा श्वास आणखी सुगंधी करते. आमृतरूंवर पिटुकल्या कैर्याचे घोस लगडतात. मैना, राघुंचे थवे, वानरांच्या टोळ्या, इवल्याशा खारूताई या मेव्यावर ताव मारण्यासाठी लगबग करतात. तिकडे माळरानावर काळी मैनाही मोहरते. काळ्या मैनेची पांढरी फुले झोकात झुलतात. साग बहरतो, वड-पिंपळ आणखी गर्द होतो. घरांसमोरच्या वेली पुष्पवती होतात. अबोली अबोलपणे फुलते. एकंदरीतच हा ऋतूबदल सगळ्यांनाच लुभावून टाकणारा, फुलवणारा, झुलवणारा ठरतो.
गुढीपाडव्यासारखे सण साजरे करताना दोन विचारांमधला, दोन पिढ्यांमधला आणि मुख्य म्हणजे दोन विचारप्रणालींमधला दुवा साधला जातो, असे नेहमी वाटत राहते कारण आता कोणी भाकडकथांवर विश्वास ठेवत नाही. जुने, जाणते सांगतात म्हणून आंधळेपणाने कृती करत नाही. ‘सत्याच्या कसोटीवर उतरल्यावरच अनुकरण’ हा आजच्या काळाचा स्वभाव आहे. म्हणूनच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आरोग्यरक्षणाचा संदेश पटल्यावरच पाळला जातोय. बदलत्या ऋतुमध्ये आचार-विचारात अपेक्षित असणारे बदल सहजतेने पोेहचवले आहेत. शरीराला ऊर्जा पुरवणारी साखरगाणी, उष्ण झळांपासून संरक्षण करण्यासाठी मातीच्या सच्छिद्र मडक्यात पाणी साठण्याची सुरूवात, ते सुंगधी करण्यासाठी वाळ्यासारख्या थंडावा देणार्या वनस्पतींचा होणारा वापर हे सगळे खूप निर्मळ आणि आल्हाददायक आहेच; खेरीज आरोग्यदायीही आहे. या साध्या नियमांचे पालन केल्यास हा उष्ण बदल सोसण्यासाठी शरीर सज्ज होते. निसर्गातील हा बदल सुखकर करण्यासाठी निसर्गघटकच कामी येतात. निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या माणसाला त्यानेच दिलेले हे बाळकडू विज्ञानाने शहाण्या झालेल्या पिढीला आता नेमके पटले आहे. म्हणूनच गुढीपाडव्याचा आनंद साजरा करताना तरुणाईही मागे राहत नाही.
देशाच्या कवाडाबाहेर पडून विश्वातल्या पसार्यात सामावलेली प्रत्येक हिंदु व्यक्ती हा सण मनोभावे साजरा करते. कारण यात मांगल्य आहे, प्रसंगावचित्य आहे आणि शिकवणही आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे दुष्ट वालीवर विजय मिळवत श्रीराम अयोध्येत परतले तो हा दिवस. त्यावेळी नगरजनांनी गुढ्या-तोरणं उभारून त्यांना अभिवादन केलं होतं. कदाचित आजही दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याची इच्छा मनी धरूनच जनलोक गुढ्या उभारत असतील. कारण दुष्ट आणि सुष्टामधली लढाई अविरत सुरू आहे. प्रत्येक काळात या दोन प्रवृत्तींमधला संघर्ष बघायला मिळतो. तो अटळ आहे. दुष्ट वालीला मारण्यासाठी सत्वगुणी रामाचे दोन हात पुरेसे ठरले. पण आता विस्तारलेल्या विश्वात दुष्ट प्रवृत्तींचा वावरही वाढलाय. उघडपणे संघर्ष करण्याची निधडी वृत्ती त्यांच्यात नाही. मुखवटे धारण करून या भ्याड प्रवृत्ती उपद्रव माजवत असतात. आजची गुढीही त्यांना पळवून लावण्यासाठी, ठोकून काढण्यासाठी उभारली जावी. कारण ती फक्त शृंगारण्यासाठी नाही तर वेळ पडल्यास पाठीत दणका घालण्यासाठीही आहे. गुढीचा कळक सर्जनशीलतेचं प्रतीक आहे तसंच ते आत्मरक्षणाचं साधनही आहे. ही काठी दुर्बल शरीराला आधार देते तशीच सबल शरीराला इतरांचे संरक्षण करण्यासाठीही मदत करते. म्हणूनच रवीतेजाच्या दिशेने शृंगारलेला कळक उभारताना स्वउन्नती आणि संरक्षणाची प्रेरणा देखील उंचवायला हवी. उभारलेल्या गुढीसारखी स्वकर्तृत्व मिरवण्याची प्रेरणा मिळायला हवी. येणार्या कडू-गोड क्षणांना सामोरे जाण्याची मानसिक स्थिरता मिळवायला हवी. कैक योजनांचा टप्पा पार करून आपल्यापर्यंत पोहचणारी ही किरणे नववस्त्राच्या झिरझिरीत पडद्यातून साखरगाठीचा गोडवा चाखत घरात येवोत आणि अर्पण केलेल्या पुष्पमालेसवे त्यांचा सुगंध कानाकोपर्यात पोहोचो, याच यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना सदिच्छा.