आज अमृतपालसारखे दहशतवादी मानसिकतेचे फुटीरतावादी नेते सोडले तर पंजाबमध्ये कोणीही वेगळ्या खलिस्तान राज्याची मागणी करत नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये या मागणीचा साधा उच्चारदेखील झाला नाही. इतकेच काय, या अमरिंदरपालचे नावदेखील काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये कोणी ऐकले नव्हते आणि आज त्याला पद्धतशीररित्या नवा ‘भिंद्रनवाले’ म्हणून प्रस्थापित केले जात आहे. पंजाबमधल्या ताज्या घडामोडींचा मागोवा.
‘वारिस पंजाब दे’ या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंगवर भारतात कडक कारवाई सुरु झाल्यामुळे परदेशामध्ये अनेक ठिकाणी अलिकडेच निदर्शने केली गेली. त्यातल्या त्यात इंग्लंडमधील भारतविरोधी निदर्शने ही काही आजची घटना नाही. 2019 मध्ये अनिवासी पाकिस्तानी ब्रिटीश नागरिकांनी विविध ठिकाणी अशीच निदर्शने केली होती. त्या आधी खालिस्तानवाद्यांनी अमेरिका, कॅनडा इत्यादी देशात असे प्रकार केले होते. मग झाल्या प्रकारानंतर प्रश्न पडतो की भारतविरोधी निदर्शनांसाठी इंग्लंड, कॅनडा हे देश खास जागा बनत आहेत का? या सार्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे अमृतपालसिंग हा तरुण. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तो जालंधरहून फरार झाला. पोलिसी छाप्यात थोडक्यात बचावला. अवैध शस्त्रांनी भरलेली त्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात आली.
आज सीआरपीएफच्या पलटणी गस्त घालून पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब अशांत बनवला गेला आहे. इंटरनेट आणि एसएमएस सुविधा काही भागात बंद होत्या. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंतसिंग मान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अर्थात त्या भेटीला पार्श्वभूमी होती ती अजनाला या पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याची. हे पोलिस ठाणे पाक सीमावर्ती भागातील. त्यावर हल्ला केला तो अमृतपालसिंग याच्या खालिस्तानवादी समर्थकांनी. ही नव्या फाळणीची नांदी आहे, अशी भीती अनेकांना वाटते.
आज अमृतपालसारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे, दहशतवादी मानसिकतेचे, फुटीरतावादी नेते सोडले तर पंजाबमध्ये कोणीही वेगळ्या खलिस्तान राज्याची मागणी करत नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये या मागणीचा साधा उच्चारदेखील झाला नाही. इतकेच काय, या अमरिंदरपालचे नावदेखील काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये कोणी ऐकले नव्हते आणि आज त्याला पद्धतशीररित्या ‘भिंद्रनवाले पार्ट 2’ म्हणून प्रस्थापित केले जात आहे… त्यानेदेखील भिंद्रनवालेसारखीच वेषभूषा करून आपली दहशत कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. दीप सिद्धू हा एक थुकरट, बाजारू पंजाबी गायक. हे नाव सर्वप्रथम दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वेळी पुढे आले. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये निदर्शने करण्यात तो अग्रभागी होता. पुढे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृतपालसिंग त्याच्या ‘वारिस पंजाब दे’ या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख बनला. त्यावेळी तो दुबईहून इथे अवतरला. त्याचाच कुख्यात हस्तक म्हणजे लवप्रितसिंग. एका अपहरणातील आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आणि एफआयआर दाखल केला. एफआयआर मागे घ्यावा आणि लवप्रितची ताबडतोब सुटका करावी यासाठी अमृतपालच्या चिथावणीवरून अजनाला पोलिस ठाण्यावर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. दुर्दैव म्हणजे पंजाब पोलिस त्याआधी काही दिवस या अमृतपालबरोबर शांततेसाठी चर्चा वगैरे करत होती.
खालिस्तानच्या मागणीचे बीज रोवले ते या देशावर राज्य करू पाहणार्या ब्रिटीशांनी. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध अनेक जाती-पाती, धर्म-पंथ यांनी एकत्र येऊन एक भारतीय म्हणून एकदिलाने लढले. त्यापासून धडा घेऊन ब्रिटीशांनी ‘फोडा आणि झोडा’ या नितीचा अवलंब करत खालिस्तानच्या विषारी मागणीला पद्धतशीर खतपाणी घातले. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही शीखांसाठी पंजाबी सुभ्याची मागणी डोके वर काढतच होती. पुढे 1966 मध्ये हिमाचल आणि हरियाना हे हिंदी भाषिकांसाठी आणि पंजाब हे गुरुमुखी शीखांसाठी असे या प्रदेशाचे त्रिभाजन झाले. पुढे 1971 मध्ये भारताच्या मदतीने बांगलादेश स्वतंत्र झाला. तत्कालीन पाक प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी ‘बांगलादेशच्या निमित्ताने जसा आमचा लचका तुटला, तसा तुमचा लचका तोडू’ या सूड भावनेने सीमावर्ती पंजाब प्रांतात खालिस्तानच्या मागणीला सर्व प्रकारचे सहाय्य पुरवले. आज दाखवल्या जात असलेल्या खालिस्तानच्या नकाशामध्ये पाकिस्तानमधील कोणताही प्रदेश समाविष्ट नाही, यातच सर्व काही आले. पुढे अकाली दलाने जम्मू काश्मिरसारखे आपल्यालाही विशेष वसाहतीचे अधिकार मिळावेत, अशी मागणी लावून धरली आणि मग पुढे आनंदपूर साहिब ठराव आला.
पुढच्या काळात ‘धर्मयुद्ध मोर्चा’ स्थापन करून भिंद्रनवालेने एक प्रकारे स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला खतपाणी घातले. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लिबरेशन फोर्स उभी करून हिंसक दहशतवादाचे थैमान घातले. ऐंशीच्या दशकात पंजाब अक्षरश: रक्ताने भिजला. संत लोंगोवाल यांची हत्या झाली आणि मग पुढ भिंद्रनवालेने अत्यंत पवित्र अशा अमृतसरमधील सुवर्णमंदिरात आश्रय घेतला आणि दहशतवादी कारवायांची तीव्रता वाढवली. पुढे 6 जून 1984 ला जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही धाडसी कारवाई करण्यात आली आणि त्यात भिंद्रनवालेचा खातमा करण्यात आला. पुढे 31 ऑक्टोबर 1984 ला दोन शीख सुरक्षा सैनिकांनी इंदिराजींची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली अन् दिल्लीत शीख विरोधी दंगली पेटल्या. हजारो शीख बांधव निर्वासित झाले. त्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली नाही याची तीव्र प्रतिक्रिया शीख समुदायात होती. म्हणूनच की काय, पुढे मनमोहनसिंग यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली. त्यावेळी निर्वासित झालेले अनेकजण भीतीपोटी परदेशात स्थलांतरीत झाले आणि तिथे त्यांनी खलिस्तान मागणीची धग चालू ठेवली. पण गेली 40 वर्षे याची आंदोलने कुठेच दिसत नव्हती. ती प्रथम दिसली शेतकरी आंदोलनात आणि आता ‘भिंद्रनवाले पार्ट 2’ बनलेल्या अमृतपालसिंगच्या निमित्ताने.
आज जागतिक पटलावर भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताच्या प्रतिक्रियेकडे जगाचे लक्ष लागलेले असते. अशा वेळी भारतात अंतर्गत अशांतता माजावी असे वाटणार्या देशी-प्रदेशी शक्ती डोके वर काढतात. केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई उभी करतात. त्याला धर्म विद्वेषाची विखारी किनार देत दुबईहून आयात केलेला असा अमरिंदरपाल उभा केला जातो. हा प्रश्न चिघळवत ठेवण्यात पंजाब पोलिसांना काय मिळाले? पंजाब हे सीमावर्ती राज्य. तिथे धर्म विद्वेषाची बीजे पेरून केंद्र विरुद्ध राज्य असे भूत उभारून खालिस्तानची मागणी पुढे रेटली की संपूर्ण देशभर शीखविरोधी वातावरण निर्माण होऊन शीख तरूणांना अधिकाधिक दहशतवादी बनवण्यात यश येईल हा तो कुटील डाव आहे.
अमृतपालला आपण भारतीय असणेच मान्य नाही. भारतीय संस्कृतीही अमान्य आहे. इथली विविधता अमान्य आहे. आपली ओळख पुसली जातेय, असा खोटा प्रचार तो करतो. तोंडात भाषा शांततेची पण दुसर्या क्षणी पोलिसांवर आरोप करत तो हिंसेचा आधार घेतो. भाषा ड्रगविरोधी लढण्याची आणि हेतू फुटीरतेचे विष पेरण्याचे. मग याला राजकीय समर्थन कोणाचे? बरे, हा निवडणूकही लढणार नाही.
मग निवडणुकीला ताकद मिळावी म्हणून याचा वापर केला जातोय का? याच्या मागणीला घाबरून पंजाब पोलिसप्रमुखांची लवप्रित या गुन्हेगारावरील एफआयआर मागे घेण्याची घोषणा अन् त्यातला निर्लज्जपणा म्हणजे हद्दच झाली. ही घोडचूक महागात पडणारी आहे. एकंदरीत, केंद्राने खलिस्तानची मागणी करणार्या दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करावा.