आम्ही जिगरबाज!

श्रीशा वागळे

आयुष्य म्हटलं की चढ-उतार आले, अडचणी आल्या. यश आणि अपयश या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. पण अनेकजण छोट्याशा अपयशाने, संकटाने खचून जातात, नाउमेद होतात. प्रसंगी टोकाचं पाऊलही उचलतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात अनेक संधी दार ठोठावत असतात. गरज असते ती या संधी साधण्याची. आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर जिद्दीने मात करण्याची! नशीबही धाडसी माणसाच्या बाजूने असतं, असं म्हणतात. ‘सच और साहस हो जिसके मन में, अंत में जीत उसी की रहे’ हे शब्द पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी खरे करून दाखवले आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. तब्बल 19 पदकं पटकावत नवा विक्रम नोंदवला. ही भारतीय खेळाडूंची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे भारताने अकरा पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये मिळून बारा पदकं पटकावली होती आणि यंदा एकाच स्पर्धेत 19 पदकं पटकावत कमाल केली. याच कारणामुळे त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत भारताने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकं पटकावली. 2016 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावे तीन पदकं होती. यंदा पदकांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. भारताच्या खेळाडूंनी मैदानात जिगर दाखवली. दुर्दम्य आशावाद आणि दृढनिश्‍चयाचं दर्शन घडवलं. जिद्द, चिकाटीचं दुसरं नाव म्हणजे पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले हे खेळाडू असं म्हटलं तर वावगं ठरू नये! या खेळाडूंंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शारीरिक अपंगत्व, सोयी-सुविधांचा अभाव, आर्थिक चणचण अशा अनेक समस्या, अडचणींवर मात करत त्यांनी हे देदीप्यमान यश मिळवलं आहे
उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं तर पॅरालिम्पिकमध्येही एका महिलेने म्हणजे भाविना पटेलने विजयी सुरूवात करून दिली. हा या दोन्ही ऑलिम्पिकमधला समान धागा म्हटला पाहिजे. अजून एक योगायोग म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरच्या दिवशी नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावत भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेचा शेवट गोड केला होता तर पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. पॅरालिम्पिकमध्ये यश मिळवणार्‍या प्रत्येक खेळाडूला आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला, झगडावं लागलं. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय हे या खेळाडूंकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. प्रयत्नांती परमेश्‍वर असं म्हणतात. या खेळाडूंसाठी त्यांचं ध्येय, लक्ष्यच सर्वश्रेष्ठ होतं आणि त्यांनी ते साध्य केलं आहे. प्रत्येक खेळाडूची कथा वेगळी, गाथा वेगळी, पार्श्‍वभूमीही वेगळी. मात्र विजिगीषु वृत्ती, दृढनिश्‍चय आणि मुख्य म्हणजे आपण कोणापेक्षाही कमी नाही, ही भावना हाच या सर्व खेळाडूंमधला समान धागा म्हटला पाहिजे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भाविना पटेल आणि अवनी लेखरा या दोन पहिला खेळाडूंनी पदकं पटकावली. अवनीने तर सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदकं पटकावली. भविनाने पॅरालिम्पिक इतिहासात टेबल टेनिसमधलं पहिलं पदक भारताला मिळवून दिलं. भविनाने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये पदार्पण केलं. 2011 मध्ये तिने पहिलं पदक पटकावलं. पॅरा टेबल टेनिस थायलंड ओपनमध्ये भविनाला रौप्य पदक मिळालं होतं. 2013 मधल्या आशियाई रिजनल चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने भारतासाठी पहिलं पदक पटकावलं. भविना जॉर्डन, चीन, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन आणि नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळते. तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अवघ्या एक वर्षांची असताना तिचा पाय लुळा पडला. भविनाला पोलिओचं निदान झालं.
निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातल्या भाविनावर सुरूवातीच्या टप्प्यात उपचार होऊ शकले नाहीत. तिच्यावर विशाखापट्टणममध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर फारशी काळजी न घेतल्यामुळे तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे तिला लहानपणीच व्हिलचेअर जवळ करावी लागली. भविना सर्वसामान्य शाळेत शिकली. 2004 मध्ये वडिलांनी तिला अहमदाबादच्या ब्लाईंड पीपल्स असोसिएशनमध्ये दाखल केलं. इथून तिने पदवी पूर्ण केली. कॉम्प्युटरचं ज्ञान मिळवलं. इथेच प्रशिक्षक लालाह दोषी भेटले आणि तिचं आयुष्य बदलून गेलं. भविना टेबल टेनिस खेळू लागली. तिने खूप मेहनत घेतली. सगळं लक्ष खेळावर केंद्रित केलं. 2007 मध्ये तिने राष्ट्रीय स्पर्धेत पहिलं पदक पटकावलं. त्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि आता तिचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झालं.
अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. त्यानंतर तिने 50 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. अवनीला अपघातामुळे अपंगत्व आलं. त्यावेळी ती अवघ्या अकरा वर्षांची होती. पाय अधू झाल्यामुळे तिला व्हीलचेअरवर बसावं लागलं.
मन रमवण्यासाठी तिला एखादा खेळ खेळण्यासाठी पाठवावं, असा विचार तिच्या वडिलांच्या मनात आला. खूपच अशक्त झाल्यामुळे तिला नेमबाजीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला. सुरूवातीला तिला बंदुकही उचलता येत नव्हती. अवनीने नेमबाजीचा प्रचंड सराव केला. कोरोनाकाळात शूटिंग रेंज बंद असतानाही ती शांत बसली नाही. तिच्यासाठी घरी डिजिटल टारगेट आणण्यात आलं. अवनीने त्यावर सराव केला. एके काळी बंदुकही उचलू न शकणार्‍या अवनीने आज दोन ऑलिम्पिक पदकं पटकावली आहेत.
पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूची कामगिरी प्रेरणादायी आहे. भालाफेकीत सुवर्णपदक पटकावणार्‍या सुमित अंतिललाही 2015 मध्ये एका अपघातात पाय गमवावा लागला. सुमितला कुस्ती खेळायची होती. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं स्वप्नही त्याने बघितलं होतं. अपघातानंतर आपलं स्वप्न हवेत विरणार असं त्याला वाटू लागलं. मात्र नंतर त्याला पॅरालिम्पिक स्पर्धेची माहिती मिळाली. प्रशिक्षकांनी त्याला भालाफेक करण्याचा सल्ला दिला. सुमितने अथक परिश्रम केले आणि अखेर पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक पटकावलं. अपघातानंतर सुमित आणि त्याच्या कुटुंबियांना बरेच टोमणे ऐकावे लागले. मात्र आता त्याने सगळ्यांची तोंडं बंद केली आहेत.
देवेंद्र झांझरियाने भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. आठ वर्षांचा असताना शॉक लागल्यामुळे देवेंद्रचा डावा हात कोपरापासून कापावा लागला. या घटनेनंतर त्याने घराबाहेर पडणं बंद केलं. पण आईने त्याला उभारी दिली. आज देवेंद्र पॅरालिम्पिक स्पर्धेत तीन पदकं पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. बॅडमिंटनमधल्या एसएच 6 विभागात कृष्णा नागरने सुवर्णपदक पटकावलं. एका जन्मजात आजारामुळे कृष्णाची उंची फारशी वाढू शकली नाही. तो बुटकाच राहिला. पण त्याने क्रीडाक्षेत्रात वेगळीच उंची गाठली. कृष्णा घरापासून तेरा किलोमीटर अंतरावरच्या मैदानात जाऊन सराव करत असे. कृष्णाच्या या कष्टांचं चांगलंच चीज झालं. बॅडमिंटनमध्ये भारताचे सात खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी तीन खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. प्रमोद भगतने एसएल 3 विभागात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं तर याच विभागात मनोज सरकारला कांस्य पदक मिळालं.
मनोज सरकारचं बालपण गरिबीत गेलं. दीड वर्षांचा असताना मनोजला ताप आला होता. त्यावेळी त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचे पाय अधू झाले. आईने शेतात काम करून पैसे जमवले आणि मनोजला बॅडमिंटन रॅकेट घेऊन दिली. हाच मनोज आज पॅरालिम्पिक पदक विजेता आहे.
नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणार्‍या मनीष नरवालला फुटबॉल खेळायचा होता. पण अपंगत्वामुळे त्याला नेमबाजीकडे वळावं लागलं. मात्र यामुळे निराश न होता त्याने सर्वस्व पणाला लावलं. मनीषने पॅराआशियाई स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं. या खेळाडूंच्या संघर्षातून, समर्पण वृत्तीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. आयुष्यात कधीही हार मानायची नसते, नेहमीच ताठ मानेने उभं रहायचं असतं आणि स्वत:ला कधीही कमी लेखायचं नसतं हाच संदेश या कर्तबगार खेळाडूंनी दिला आहे. शारीरिकच काय, कोणतीही मर्यादा आपल्याला रोखू शकत नाही, हेच त्यांनी दाखवून दिलं आहे.

Exit mobile version