प्रमोद मोकल
19 ऑक्टोबर हा परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय टाटा) यांचा जन्मदिवस. संपूर्ण स्वाध्याय परिवार हा दिवस ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. गत वर्ष 2019-20 हे परम पूजनीय दादांचे जन्म शताब्दी वर्ष होते. परंतु याही वर्षी अखिल वैश्विक स्वाध्याय परिवार दादांची जन्मशताब्दी उत्साहाने साजरी करत आहे. त्यानिमित्ताने हा लेख.
आज एखाद्या व्यक्तीकडे पद, पैसा, प्रतिष्ठा असेल तरच समाजामध्ये त्याला किंमत आहे. ज्यांच्याकडे यापैकी काहीही नाही त्याला हीन दिन समजले जाते. गौण मानले जाते. परंतु पद, पैसा यामुळेच माणसाला किंमत आहे का? पूजनीय दादांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘पद, पैसा, प्रतिष्ठा हे मसाला दुधातील मसाल्यासारखे आहे. मसाला नाही घातला तरी दुधाला स्वतःची चव आहे की नाही! तसेच पद, प्रतिष्ठा याशिवाय ही माणसाला किंमत आहे. मूल्य आहे. सर्वशक्तीमान प्रभू प्रत्येक मानवामध्ये वास करत आहे ‘सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्ट’ आणि हाच त्याचा खरा गौरव आहे’ मनुष्याचा गौरव त्याच्याकडे असलेल्या पैसा, पद किंवा प्रतिष्ठेमुळे नाही तर आत बसलेल्या चित्त शक्तीमुळे आहे हा मनुष्य गौरवाचा मुख्य विचार. (पूजनीय दादांनी समजावला.)
थोडे खोलात शिरुन विचार केला तर लक्षात येईल की मानवी मूल्यांचे अधःपतन झाल्यामुळे मानव समाज एका भयंकर स्थितीवर येऊन ठेपला आहे. मानवता, समानता, बंधुभाव हे शब्द फक्त पुस्तकात किंवा मोठमोठ्या सभा, व्याख्यानातून बोलण्यापुरते मर्यादित राहिले आहेत. प्रत्यक्षात मात्र माणूस र्झीीलहरीश उेाोवळीूं बनला आहे. स्वतःचे सत्व आणि स्वत्व हरवून बसला आहे. चार पैसे फेकून त्याला विकत घेता येते. हवे तसे वागवता येते आणि दुःखाची गोष्ट म्हणजे त्याला स्वतःला देखील त्याचे वाईट वाटत नाही. पैसा मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जायला तो तयार आहे, एखादी पद मिळवण्यासाठी स्वतःच्या संबंधांना देखील तिलांजली द्यायला तो तयार आहे. येनकेन प्रकारे प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात राहण्यासाठी त्याला न शोभणारे वर्तन करायला तो तयार आहे. कारण पद, पैसा, प्रतिष्ठा यांना एवढं महत्व प्राप्त झाले आहे की ते जीवन जगण्याचे साधन न राहता साध्य बनले आहे. पूजनीय दादा म्हणतात, ‘कोणी तरी चार भाकरीचे तुकडे फेकतो आणि शंभर हात त्यावर तुटून पडतात. ही अनितकता, ही लाचारी, काय हे मानव्य आहे?’ पण मग एखाद्याकडे पैसा, पद, बुद्धीमत्ता यापैकी काहीही नसेल तर त्याने गौरव ठेवायचा तरी कसला? पूडनीय दादा म्हणतात, ‘ममैवांशी जीवलोके’ मी प्रभूचा अंश आहे तेव्हा मी सामान्य नाही हा गौरव मनात असायला हवा. त्याचप्रमाणे ‘सर्वस्यचाहं हृदिसन्निविष्ट’ तुला तसेच या संपूर्ण जगाला निर्माण करणारा, चालवणारा प्रभू प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात येऊन बसला आहे. तेव्हा पर सन्मान देखील हवा. हेच मनुष्य गौरवाचा बीज आहे.
‘भगवंत माझ्यासोबत आहे’ केवळ एवढे सांगून पूजनीय दादा थांबले नाहीत तर माझ्या जीवनात भगवंताचे महत्त्व उभे केले, स्थान निर्माण केले. आज आपल्या जीवनात भगवंताला महत्त्व किती? भगवंताचे स्थान काय? एका बाजूला भीतीतून आणि आवश्यकतेमधून भक्ती करणारा मोठा वर्ग आहे. पूजनीय दादांच्या भाषेत सांगायचे तर ‘आज भक्तीला पूर आला आहे. पण पुराचे पाणी पिण्यासाठी उपयोगाचे नाही तसेच आजची भक्ती जीवन पुष्ट करीत नाही. जीवनात येणार्या सुख, दुःखांना कठीण प्रसंगांना तोंड देण्याची हिंमत त्या भक्तीतून मिळत नाही.’ तर दुसर्या बाजूला असा एक वर्ग आहे. ज्यांच्याकडे पैसा, प्रतिष्ठा, बुद्धीमत्ता अमाप आहे. परंतू त्यांना जीवनात भगवंताची आवश्यकता वाटत नाही किंवा भगवंतावाचून त्यांचे काही अडत नाही. खपींशश्रश्रशर्लीींरश्र ीेुंरीवी ॠेव उभे करुन पूजनीय दादांनी या दोन्ही वर्गातील लोकांच्या जीवनात भगवंताचे महत्व आणि स्थान निर्माण केले.
मनुष्य गौरव दिन
रामनवमी व कृष्णाष्टमी हे उत्सव जसे सर्व भारतीयांच्या हृदयात हजारो वर्षे स्थिर झालेले पवित्र दिवस आहेत. तसेच स्वाध्याय परिवारासाठी व त्यांचा परिचय असणार्यांसाठी अश्विन शुद्ध सप्तमी हा दिवस परम पूजनीय पांडुरंग शास्त्री (दादाजी) यांचा जन्मदिवस म्हणून आनंद पर्वणीच असते. रामकृष्णांचे जन्म, त्यांच्या लीला या सर्व समाजाला माहीत असतात पण त्या चरित्रांचा खरा गाभा पूजनीय दादांनी समजावला, रामकृष्णांच्या काळात त्यांनी अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलेले नेतृत्व, तसेच प्रसंगी तत्वज्ञानाला लागलेले चुकीचे वळण लक्षात आणून देऊन धर्माची संस्थापना केली. या रामकृष्णांच्या कार्याची परंपरा पूजनीय पांडुरंग शास्त्री समर्थपणे पुढे नेत आहेत. इतिहासात विस्मृत झालेले अवतार, ऋषी, आचार्य तसेच संत यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्या त्या चरित्रांना खरा न्याय देण्याचे कार्य केले.
त्यासाठी पूजनीय दादांनी 1942 पासून मुंबई येथील ‘श्रीमद्भगवगीता’ पाठशाळेत अखंड ज्ञानयज्ञ सुरु ठेवला. पूजनीय दादांच्या अमोघ वाणीतून नारदसामान्य माणसाला नारद, पराशर, वाल्मिकी यांसारख्या विविध विभूतींची ओळख झाली. रावण वध व कंस वध एवढ्यापुरताच माहित असलेला, रामकृष्णांचा परिचय पूजनीय दादांनी अधिक चांगल्याप्रकारे समजावला. रामाने निर्माण केलेला लोभविवर्जित समाज व कृष्ण भगवंतांनी गायिलेली गीता सर्वसामान्यांना परिचित करुन दिली. गीतेचे श्लोक लाखो मस्तकात अर्थासकट स्थिर केले. रोह्यासारख्या छोट्या शहरात 19 ऑक्टोबर 1920 रोजी अवतरलेलं हे चैतन्य मनूच्या माशासारखं विस्तारत-विस्तारत पाचही खंडात आजच्या तारखेला व्यापून राहिलं आहे. आजही त्यांची वाणी सागर किनारा, आदिवासी विभाग, सुशिक्षित नागर वर्ग असा संपूर्ण भारत देश-विदेशात घुमत आहे. लाखो लोकांना प्रभू सन्मुख करत आहे. पूजनीय दादांनी ‘बुद्धियोगमुपाश्चित्य’ या भगवद् वचनाप्रमाणे सामान्यातल्या सामान्य माणसापासून प्रकांडपंडितापर्यंत सर्वांना देवाचं अस्तित्व पटवून दिलं. त्यामुळे लाखोंचा समूह पूजनीय दादांकडून प्रेरणा घेऊन खेड्यापाड्यातून फिरु लागलो व पुस्तकात बंद असलेला निष्काम कर्मयोग लाखो लोकांच्यात साकार झाला. वेद, गीता, भागवत, उपनिषद ही सर्वसामान्यांसाठी खुली केली. सर्वसामान्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे, दृष्टांत यांच्या माध्यमातून अवघड समजले जाणारे व केवळ विद्वानांच्या चर्चात स्थान असलेलं तत्वज्ञान सर्वजनसुलभ करुन दिलं.
तत्वज्ञान हा फक्त पुस्तकाचा विषय नसून दैनंदिन जीवन देवसन्मुख करणारा राजपथ आहे हे पूजनीय दादांनी कृतीतून दाखवून दिलं. आजच्या तारखेला लाखो लोक कुठल्याही प्रलोभना व भीती शिवाय दादांच्या प्रेरणेने नियमित निःस्वार्थपणे जवळपासच्या खेड्यात जाऊन पूजनीय दादांचे विचार जीवनात उतरवण्यासाठी व भक्तीची बैठक पंक्ती करण्याच्या भूमिकेतून जनसामान्यांना दैवी मातृभावाने भेटत आहेत, विविध प्रयोगांची माहिती देत आहेत, माणूस उभा करण्याच्या प्रकियेत माणसांनाच सावध बनवून पूजनीय दादांनी अद्भूत वैकल्पिक समाज उभा केला आहे. कोळी, शेतकरी, कलाकार, डॉक्टर, अशा विविध समूहात स्वकर्मानी ईश्वर पूजन करणारा साधक वर्ग आजच्या तारखेला विश्वात अखंड तप करत आहे. अशा विभूतीच्या अवतरणाला 19 ऑक्टोबर 2021 रोजी शंभर वर्ष पूर्ण होऊन दुसरे शतक सुरु होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण स्वाध्याय परिवार गेले वर्षभर कोव्हिड सारख्या कठीण परिस्थितीतही पूजनीय दीदींच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमांद्वारे आपापल्या घरातूनच लाडक्या दादांना कृतज्ञतापूर्वक वंदन करत आहेत. कोव्डिड-19 ने घातलेल्या मर्यादांमुळे परिवाराला पूजनीय दादांचा शंभरावा जन्मदिवस उत्साहाने साजरा करता आला नाही, म्हणून कोव्हिडचा प्रभाव कमी झाल्यावर मोठ्या उत्साहाने पूजनीय दादांना वंदन करण्यासाठी संपूर्ण स्वाध्याय परिवार उत्सुक आहे. आयुष्यभर अथकपणे आणि अवितरणपणे मनुष्य गौरवाचा विचार घेऊन फिरणार्या आणि लाखो लोकांच्या जीवनात मनुष्य गौरवाद्वारे परिवर्तन घडवून आणणार्या या महापुरुषाचा जन्मदिवस ‘मनुष्य गौरव दिन’ याशिवाय दुसरा काय असू शकतो?
शेवटी पूजनीय दीदींचा (पूजनीय दादांच्या सुपुत्री आणि स्वाध्याय कार्यप्रमुख) भाषेत सांगायचे झाले तर
जिक्र जब आएगा इन्सान की तरक्की का ।
आपका नाम ही बडे फक्र से जहां लेगा ॥