नदी पात्रात सडलेली मासळी, मृत कोंबड्यांचा खच, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
| धाटाव | वार्ताहर |
रोह्याची जीवनवाहिनी म्हणून परिचित असलेली कुंडलिका नदी जास्तच प्रदूषित होऊ लागली आहे. नदी पात्रात सडलेली मच्छी, मृत कोंबड्यांचा खच पडला असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून सातत्याने जनजागृती, पाठपुरावा केला जात आहे. मात्र ढिम्म प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पाऊले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता सावधान… म्हणायची वेळ स्थानिकांवर आलेली आहे.
कुंडलिका नदीच्या संवर्धनाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. यावर तब्बल 30 कोटींहून अधिक रुपये खर्च देखील करण्यात आले. मात्र कुंडलिका नदीच्या पात्राचे संवर्धन न करता फक्त किनाऱ्याचे सुशोभीकरण करून पैसे हडप करण्यात आले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शहरातील नाले, सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जात असून बाजूलाच बाजारपेठ असल्याने मांसाहारी कचरा संपूर्ण नदी पात्रात टाकला जात आहे.
दूषित पाणी नाल्याद्वारे थेट नदीत सोडण्यात येत असल्याने रोहा शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली आहे. त्यात आता सडलेली मच्छी, मटण व कोंबड्यांची भर पडल्याने प्रदषणात अतिरिक्त वाढ होत असल्याचे दिसते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कुंडलिका नदी बचाव समितीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप वडके यांनीही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र तरीही अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कुंडलिकीचे अस्तित्वच नष्ट होत चालले
काही वर्षांपूर्वी रोहा शहराला या नदीतून पाणीपुरवठा केला जात होता. आता तीच कुंडलिका नदी बेवारस होऊ लागली आहे. या नदीची हेळसांड होत असून नदीचे अस्तित्वच संपुष्टात येत चालले असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत असल्याने अनेक जण नाराजी व्यक्त करीत आहेत.