श्रीवर्धनमध्ये लाखो लिटर पाणी वाया

फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्तीची मागणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणारा रानवली पाझर तलाव श्रीवर्धनपासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे. या पाच किलोमीटर मार्गावरती जलवाहिन्या बदलण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचीनिर्मिती देखील करण्यात आली. परंतु, सदर ठेकेदाराने वापरलेल्या जलवाहिन्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे वारंवार फुटत असल्याचे समोर येत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प ते साठवण टाकी या अंतरातील जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सदर जलवाहिन्या बदललेल्या असून, सुद्धा वारंवार का फुटतात? यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन देखील केले होते. मात्र, या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेक वेळा जसवली फाटा ते आराठी या ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आढळून येतात. जलवाहिन्यांमधून वाहणारे पाणी शेतामध्ये जाऊन तुंबलेले पाहायला मिळते. आता श्रीवर्धन शहरात अंतर्गत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. मे महिन्यात श्रीवर्धन नगरपरिषेकडून धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती ई-टॉयलेटची निर्मिती करण्यात आली आहे. या ई-टॉयलेटला पाणीपुरवठ्यासाठी टाकलेली जलवाहिनी मागील अनेक दिवसांपासून फुटलेली असून नगर परिषदेने या ठिकाणचा पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर सदर जलवाहिनीतून पाणी जाऊन त्या ठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळते. ई-टॉयलेटचीनिर्मिती झालेली असून, अद्याप त्यांचा वापर सुरू करण्यात आलेला नाही.

यावर्षी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे मे महिन्यात श्रीवर्धन शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आता तरी नगरपरिषदेने धरणात असलेला पाणीसाठा जपून वापरावा व जलवाहिन्या फुटलेल्या आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Exit mobile version