सामान्यांच्या विकासासाठी लाल बावटा हाच सक्षम पर्याय, भाई रामदास जराते यांचे प्रतिपादन

शेतकरी कामगार पक्षाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लाल बावट्याला मानवंदना
गडचिरोली । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत रस्त्यावर आणि विधिमंडळात भांडवलदार आणि खुर्ची प्रेमींच्या विरोधात निष्ठेने संघर्ष करुन सामान्य माणसांच्या हिताचेच राजकारण शेतकरी कामगार पक्षाने केले असून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी भटके विमुक्त आणि बहुजनांच्या खर्‍याखुर्‍या विकासासाठी राज्यात शेकापचा लाल बावटा हाच सक्षम पर्याय आहे,असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
लाल बावट्याला लाल सलाम ची मानवंदना देताना महिला नेत्या जयश्री वेळदा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कारेते, गुरवळा ग्रामपंचायतच्या सरपंचा दर्शना भोपये, ग्रा.प. सदस्य चंद्रकांत भोयर, पुलखल ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम गेडाम, राजू ठाकरे, कार्यालयीन चिटणीस श्रीधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई रामदास जराते पुढे म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेला आज 74 वर्ष पूर्ण होत असतांनाच पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे शेकापक्षाची मोठी वैचारिक हानी झाली. मात्र नाना पाटील, उद्धवराव पाटील, गणपतराव देशमुख यांचा कृतिशील वारसा त्याच नेटाने पुढे चालविण्यात येणार असून सामान्य माणसांच्या हितासाठी शेकापचा लाल बावटा अव्याहतपणे संघर्षरत राहणार आहे. राजकारणातील बदलासाठी तरुणांना संधी देण्यात येणार असून तरुणांनी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घ्यावा असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.
कार्यक्रमाला संजय बोधलकर, राजकुमार प्रधान, धनराज भोपये, विजया मेश्राम,मंदा आवारी, पुष्पा कोतवालीवाले, सुनिता पवार, योगिता कारेते, पार्वता लटारे, शालू आभारे, रजनी खैरे, धारा बन्सोड, सतिका खोब्रागडे, गिता प्रधान, वेणू लाटकर, मनिषा हजारे, सरस्वती मेश्राम यांची उपस्थिती होती.

Exit mobile version