नेरळ ग्रामपंचायतीकडून कर्मचार्यांना सहकार्याचे आवाहन
| नेरळ | वार्ताहर |
नेरळ ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टी यांची थकित वसुली मोहीम सुरु करण्यात आली आहे. पैसे जमादेखील होत आहेत. तेव्हा आता आपण महिन्याला दोन पगार करू आणि कर्मचार्यांचे थकित वेतन प्रकरण निकाली काढू. या आंदोलनामुळे ग्रामस्थांचीदेखील गैरसोय होत आहे. त्यामुळे कर्मचार्यांनीदेखील नेरळ ग्रामपंचायतीला सहकार्य करून हे कामबंद आंदोलन थांबवावं, असे आवाहन उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी कर्मचार्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, या आवाहनानंतर आता कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांचे गेले नऊ महिन्यांचे वेतन थकले आहे. याबाबत मनसे महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या नेरळ येथील युनिटचे अध्यक्ष तथा पदाधिकारी यांनी कामगारांचे पगार वेळेत द्या, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिल्यानंतर कामगारांचे पगार वेळेत होतील, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले होते. मात्र, ते आश्वासन हवेत विरल्याने आता कामगारांनी दि. 11 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरु केले आहे. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन ग्रामपंचायत दालनात दि. 13 मार्च रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, ग्रामसेवक अरुण कारले, सदस्य शिवाली पोतदार, श्रद्धा कराळे, गीतांजली देशमुख, जयश्री मानकामे, उमा खडे, संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीकडून कामगारांशी चर्चा करण्यात आली, मात्र ती वेळोवेळी निष्फळ ठरली असल्याचे म्हसकर यांनी सांगितले. अशात या महिन्यापासून नेरळ ग्रामपंचायतीने थकित वसुलीवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. त्यामुळे तिजोरीत काही अंशी भर पडत आहे. तेव्हा आता आम्ही प्रत्येक महिन्याला कर्मचार्यांना दोन पगार देऊन शिल्लक पगाराचा तिढा सोडवू, तर 2018 पासून कामगारांचे पगार शिल्लक आहेत. आमची बॉडी बसल्यावर 5 पगार शिल्लक राहिले, तर अगोदर चार पगार शिल्लक होते. तेव्हा काय झालं काय नाही यापेक्षा कामगारांचे पगार झाले पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत.