। रत्नागिरी । वृत्तसंथा ।
कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणार येथे करण्याला स्थानिकांचा विरोध आहे. कोकणतील रिफायनरीसाठी स्थानिकांशी चर्चा करून त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवणार आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर त्याचं स्वागत आहे. यासाठी लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणार असल्याचं वक्तव्यही मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, आता नाणार ऐवजी रत्नागिरीतील बारसू येथे हा प्रकल्प होणार असल्याचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहलं आहे. त्यामुळे आता रिफायनरी विरोधात पुन्हा एकदा राजापुरातील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
कोकणातील रिफायनरीबाबत लोकांचा निर्णय शिवसेनेला मान्य – संजय राऊत
यावेळी बारसु येथे हा प्रकल्प होण्याला राजापूर येथील स्थानिकांनी याला विरोध केला असून यासाठी त्यांनी तहसिलद कार्यालयावर मोर्चा काढला आहे. कोकणात रिफायनरीला थारा नाही असं म्हणतं त्यांनी रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. पारंपारिक गाणी आणि वाद्यांच्या सहाय्यानं या स्थानिकांनी येथे विरोध नोंदवला आहे. आमच्या गावात रिफायनरी नको आहे. कारण यामुळे कोकणातील निसर्गाचे नुकसान होणार आहे. आम्हाला कोकणात आणि या गावांत हा प्रकल्प नको अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. कोणतीही मोठी उलाढाल होऊदे, अगर रोजगार मिळुदे काहीही झालं तरी गावात रिफायनरी येऊ देणार नाही असंही येथील स्थानिकांनी स्पष्ट केलं आहे.